Ajit Doval : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची हानी झाल्याचे एक तरी छायाचित्र दाखवा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

‘ऑपरेशन सिंदूर’विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले

अजित डोवाल

चेन्नई – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी वक्तव्य करतांना म्हटले की, ‘या ऑपरेशनच्या वेळी भारताची हानी झाली’, असे म्हणणार्‍यांनी ‘हानी झाल्याचे छायाचित्र दाखवावे.’ अनेक परदेशी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या कारवाईविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच यात भारताचे मोठ्या प्रमाणात हानी झाली, अशा बातम्या छापल्या. या पार्श्वभूमीवर ‘आयआयटी मद्रास’ येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना डोवाल यांनी हे वक्तव्य केले आहे.

ते पुढे म्हणाले की,


१. तंत्रज्ञान आणि युद्ध यांच्यातील संबंध नेहमीच महत्त्वाचा असतो. आम्हाला ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभिमान आहे. आम्ही या कारवाईच्या वेळी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही सीमेपलीकडे असलेल्या ९ पाकिस्तानी तळांवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्यांपैकी सीमावर्ती भागात एकही तळ नव्हता. आमचे सर्व लक्ष्य अचूक होते. आम्ही केवळ आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

२. तुम्ही अशा देशात वास्तव्य करतात, ज्याची संस्कृती सहस्रो वर्षांपासून संकटात आहे. आपल्या पूर्वजांनी पुष्कळी काही सहन केले आहे. राष्ट्राची ही संकल्पना जिवंत ठेवण्यासाठी त्यांना किती अपमान आणि दुःख सहन करावे लागले असेल ?, हे मला ठाऊक आहे. भारत एक राष्ट्र म्हणून सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात आहे.