India Warns Türkiye And China : तुर्कीये आणि चीन यांनी भारत-पाक संघर्षाविषयी संवेदनशील रहावे !

पाकिस्तानला पाठिंब्यावरून भारताने तुर्कीए आणि चीन यांना सुनावले  

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत ७ ते १० मे या कालावधीत झालेल्या सैन्य संघर्षाच्या वेळी पाकिस्तानने भारताविरुद्ध चीन आणि तुर्कीए देशांतील शस्त्रे आणि उपकरणे यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने तुर्कीए आणि चीन यांना भारत-पाकिस्तानमधील संघर्षाविषयी संवेदनशील रहाण्यास बजावले आहे.

१. भारताने म्हटले आहे, ‘पाकिस्तानने सीमेपलीकडून होणार्‍या आतंकवादाला पाठिंबा देणे थांबवावे आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्याने जोपासलेल्या आतंकवादाच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी आग्रही विनंती तुर्कीयेने पाकला करणे आवश्यक आहे.

२. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीनचे परराष्ट्रमंत्री यांनी १० मे २०२५ या दिवशी एकमेकांशी चर्चा केली होती. त्यामुळे चीनला माहिती आहे की, परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता हा भारत-चीन संबंधांचा आधार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनला सुनावले आहे.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

३. पाकिस्तानने विनवणी केल्यानंतरच भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधीवर  समझोता झाल्याचे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप पूर्ण झालेले नाही. भविष्यात आतंकवादी आक्रमणे झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पुन्हा पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर आक्रमणे करील’, अशी चेतावणी त्यांनी दिली.

संपादकीय भूमिका

अशा चेतावण्यांना चीन आणि तुर्कीये कोणतीही भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे. या दोघांना शस्त्रांची भाषा समजत असल्यामुळे त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !