पाकिस्तानी सैन्यदलप्रमुख धार्मिक कट्टर ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – पहलगाममधील आक्रमण पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केले आणि हिंदु धर्मातील नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. २६ जणांना अतिशय निर्दयीपणे त्यांच्या कुटुंबांसमोर मारण्यात आले. धार्मिक मतभेद निर्माण करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पाकिस्तानी बाजूकडे पहावे लागेल. त्यांचे नेतृत्व, विशेषतः त्यांचे सैन्यदलप्रमुख खूप धार्मिक कट्टर आहेत, अशी टीका भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केली. ते नेदरलँड्सच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी कुणीही मध्यस्थी केली नाही !

भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट चर्चेद्वारे युद्धविरामावर सहमती दर्शवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताशी अनेक देशांनी संपर्क साधला; पण भारताने अमेरिकेसह प्रत्येक देशाला हेच सांगितले की, जर पाकिस्तानला युद्धविराम हवा असेल, तर त्याला थेट भारताशी बोलावे लागेल, अशी माहितीही डॉ. जयशंकर यांनी या वेळी सांगत या प्रकरणी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला.

संपादकीय भूमिका

केवळ सैन्यदलप्रमुखच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानच धार्मिक कट्टर असून धार्मिकतेवरूनच पाकची निर्मितीही झाली असल्याने पाकशी जशास तसे वागणे आवश्यक आहे !