भारताने पाकिस्तान सरकारच्या चेहर्‍यावर कानफटात मारली आहे, याकडे ते दुर्लक्ष करत आहे ! – ‘डॉन’ वर्तमानपत्राचे माजी संपादक अब्बास नासिर

  • पाकमधील ‘डॉन’ वर्तमानपत्राच्या माजी संपादकाने पाकला दाखवला आरसा !

  • पाकिस्तानच युद्धविरामासाठी प्रयत्न करत असल्याचे केले उघड !

‘डॉन’ वर्तमानपत्राचे माजी संपादक अब्बास नासिर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने पाकच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकची मोठ्या प्रमाणात हानी केल्यानंतरही पाक सरकारने त्यांचा विजय झाल्याचा दावा करत उत्सव साजरा केला; मात्र पाकच्याच ‘डॉन’ वर्तमानपत्राचे माजी संपादक अब्बास नासिर यांनी ‘डॉन’मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, भारतावरील विजयाबद्दल पाकिस्तानात उत्सव चालू  आहे; पण पाकिस्तान सरकारच्या चेहर्‍यावर कानफटात बसली आहे, त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत.

नासिर यांनी या लेखात म्हटले आहे की,

१. भारताचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ आधी बालाकोट किंवा पाकव्याप्त काश्मीरपर्यंत असायचे; पण या वेळी आक्रमण पाकच्या पंजाबमध्ये झाले आहे. भारताने रफिकी, नूर खान, मुरिदके यांसारख्या पाकिस्तानी सैन्यदलाच्या तळांना लक्ष्य केले आहे. लाहोरपर्यंत येऊन भारताने हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली.

२. भारताच्या आक्रमणासमोर पाकची हवाई संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली आहे. पाकिस्तानच युद्धविरामासाठी प्रयत्न करत होता. पाकिस्तानी मंत्र्यांनी आक्रमणाच्या वेळी  जी विधाने केली, त्यामुळे पाकिस्तानला मानसिक झटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच परराष्ट्रमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यामधून पाकिस्तानला तात्काळ युद्धविराम हवा होता, हा संदेश गेला.

३. भारत आतंकवादाचे सूत्र संयुक्त राष्ट्रांपर्यंत घेऊन जाणार आहे. पाकिस्तानसाठी हे संकेत चांगले नाहीत.