२६ नोव्हेंबर २००८ चे आतंकवादी आक्रमण विरुद्ध पहलगाम, म्हणजेच ‘भीषण मौन’ विरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ !

(टीप : ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे पहलगाममधील आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा प्रतिशोध म्हणून भारतीय सैन्याने राबवलेली मोहीम !)

७ मे २०२५ या दिवशी सकाळपासून काही अधू डोक्याच्या पुरोगामी मधूंनी (लोकांनी) अकलेचे तारे तोडलेले पाहून उदंड करमणूक झाली. कालपर्यंत ‘मॉक ड्रिल’ची (आपत्कालीन यंत्रणांचा सराव) खिल्ली उडवण्यात दंग असलेल्या या अर्धवट लोकांची अवस्था ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झालेली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उघड विरोध तर करता येत नाही; कारण ‘तसे केल्यास लोक तोंडात अगदीच शेण घालतील; पण मोदी सरकारला श्रेय तर चुकूनही द्यायचे नाही’, अशा कात्रीत सापडल्यामुळे या ‘जमात-ए-पुरोगामी’ने सर्व श्रेय सैन्याला देणार्‍या ‘पोस्ट’चा (लिखाणाचा) पाऊस पाडला आहे, जणू काही सैन्यच स्वतःहून नियंत्रण रेषा पार करायचा, ‘एअर स्ट्राईक’ करायचा निर्णय घेते, पत्रकार परिषद घ्यायचे ठरवते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

१. …यापूर्वी असलेला राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशीचे मुंबईतील आतंकवादी आक्रमण

असे जर असते, तर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत जी इतकी पाकिस्तान प्रणित भयानक आतंकवादी आक्रमणे झाली, त्यांचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘एअर स्ट्राईक्स’ नसते का केले ? भारतीय सैनिक, सैन्य आणि सैन्यशक्ती तेव्हाही इतकीच सक्षम होती की ! २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीचे मुंबईतील आतंकवादी आक्रमण आणि पहलगामचे आतंकवादी आक्रमण, तेव्हाचे भीषण राजकीय मौन अन् नेभळटपणा विरुद्ध आता २ आठवड्यांच्या आत दिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’चे दणदणीत प्रत्युत्तर यांत भेद काय ? भेद आहे राजकीय इच्छाशक्तीचा, सैन्यामागे सर्व शक्तीनिशी ठामपणे उभ्या रहाणार्‍या सशक्त नेतृत्वाचा ! ‘घरमें घुसके मारेंगे’ (घरात घुसून मारू), असे म्हणणार्‍या विजिगीषू वृत्तीचा !

२. माजी वायूदलप्रमुखांनी वर्णिलेली वर्ष २००८ मधील परिस्थिती

भारताचे वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल फली मेजर

हे मी म्हणत नाही. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी भारताचे वायूदलप्रमुख असलेल्या एअर चीफ मार्शल फली मेजर यांनी शिव अरूरला बालाकोट ‘एअर स्ट्राईक’ नंतर दिलेल्या मुलाखतीत हे अगदी स्पष्टपणे सांगितले, ‘भारताची राजकीय इच्छाशक्ती पालटली आहे.’ त्यांच्यानंतरचे वायूदलप्रमुख बी.एस्. धनोआ यांनी तर ‘व्हीजेटीआय’च्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे सांगितले होते, ‘२६ नोव्हेंबर २००८ या दिवसानंतर वायूदलाने पाकिस्तानात घुसून तेथील आतंकवादी तळ नष्ट करण्याची पूर्ण योजना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काँग्रेस सरकारला दिली होती; पण स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी या योजनेला नकार दिला.’’

स्वतः कमालीचे कमकुवत आणि निर्णय घेण्यास असक्षम असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह अन् स्वतःची छबी जपण्याच्या हव्यासात हरवलेल्या सोनिया गांधी यांनी सैन्याला मोकळीक न देता राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण केले. परिणामी २६ नोव्हेंबर २००८ या दिवसानंतरच्या आतंकवादी आक्रमणाला उत्तरदायी असलेल्या पाकमधील लोकांना शिक्षा करू शकलेलो नाही. वर्ष २००८ मध्ये भारताची परिस्थिती आणि प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘कुणीही यावे अन् टपली मारून जावे’, अशीच होती.

३. भारताचे परराष्ट्र धोरण सशक्त असल्याचा परिणाम

आज परिस्थिती काय आहे ? भारताने पाकिस्तानात थेट १०० किमी आत घुसून आक्रमण केले, न अमेरिकेने एक चकार शब्द उच्चारला, न इस्लामी देशांनी ! ब्रिटनसमवेत तर आपण नुकताच मोठा व्यापार करार केला आहे. इराणपासून अफगाणिस्तानसारखे इस्लामी कट्टरतावादी देशही पाकिस्तानच्या विरोधात आहेत. पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र धोरण जर इतके सशक्त नसते, तर हे शक्यच नसते; पण सुमार डोक्याच्या कुमार विचारवंतांना हे कोण सांगणार ?

४. मोदीद्वेष्ट्यांनी स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता !

पहलगाममधील पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणानंतर केवळ एका पंधरवड्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानात ९ वेगवेगळ्या ठिकाणी घुसून अचूक आणि धीट कारवाई केली, तीही केवळ नियंत्रण रेषेपलीकडेच नाही, तर पाकिस्तानी पंजाबमध्ये १०० किलोमीटर आत असलेल्या बहावलपूरपर्यंत. हे ‘स्ट्राईक्स’ ‘प्रिसिजन स्ट्राईक’ होते, म्हणजे आतंकवादी प्रशिक्षण तळ नेमके कुठे आहेत ? याची माहिती काढून हे ‘स्ट्राईक्स’ नियोजनबद्ध केले गेले होते. हे एका दिवसात घडत नाही किंवा केवळ सैन्य हा निर्णय घेत नाही अन् घेऊ शकत नाही.

हे ‘एअर स्ट्राईक्स’ भारतीय सैन्य किंवा वायूदल अचानक अधिक सक्षम झाल्यामुळे घडले नाहीत. भारतीय सैनिक नेहमीच सक्षम होते. भेद इतकाच आहे की, आता त्यांच्या पाठीशी खंबीर राजकीय नेतृत्व उभे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय केवळ सैनिकांचे आहे, मोदींचे नाही’, असे म्हणणार्‍या बिनडोक मोदीद्वेष्ट्यांनी जरा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकत घ्यावी.

५. सैन्याने केलेली कारवाई ही निर्णायक कृती करणार्‍या नेतृत्वाचे प्रतीक !

सौ. शेफाली वैद्य

केवळ हिंदु पुरुषांना ‘टार्गेट’ (लक्ष्य) करून २६ हिंदु स्त्रियांना विधवा करणार्‍या पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर केलेल्या सैन्य कारवाईला मुद्दाम समजून उमजून ‘आपॅरेशन सिंदूर’ हे नाव देणे, कारवाईची अचूक वेळ, २ महिला अधिकारी त्यातील एक हिंदु आणि एक मुसलमान यांची पत्रकार परिषदेसाठी निवड करणे, त्यातही ‘नॉन-कॉम्बॅट सिग्नल कोअर’ शाखेतील कर्नल सोफिया कुरैशी यांची पत्रकार परिषदेसाठी निवड करणे, हे सगळे योगायोगाने झाले, असे वाटते का ? त्याच वेळी पंतप्रधानांनी स्वतः महिला राष्ट्रपतींना म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांना ‘ब्रीफ’ (थोडक्यात माहिती सांगणे) करायला जाणे, ही काय आपोआप घडून आलेली गोष्ट आहे का ?

‘ही सर्व उच्च स्तरावर आखलेली रणनीती आहे, एका अशा नेतृत्वाने मांडलेला बुद्धीबळाचा डाव आहे ज्याला प्रतीक, ‘टाईमिंग’ (अचूक वेळ), दृश्य परिणाम या सर्वांची जबरदस्त समज आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे नेतृत्व ‘निर्णायक कृती करणारे’ आहे. नुसतेच ‘हम देखेंगे, हम करेंगे’ म्हणणारे नेभळट मनमोहन सिंह यांचे नेतृत्व नाही. मोदी सरकारने सैन्याला केवळ मोकळे रान दिले नाही, तर राजकीय, मुत्सद्दी आणि नैतिक पाठबळ दिले. जेव्हा एका भारतीय सैनिकाला हा विश्वास असतो की, त्याचे नेतृत्व त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, तेव्हा तो पराक्रमाची शर्थ करतो. वर्ष २००८ मध्ये भारतामध्ये शूर सैनिक आणि सैन्य अधिकारी यांची कमतरता नव्हती, तर देहलीमध्ये सशक्त अन् खंबीर नेतृत्वाची वानवा होती.

६. तथाकथित विचारवंतांचे असंबद्ध वागणे

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर आहेत, नेभळट मनमोहन सिंह नाहीत आणि भेद तिथेच आहे, जे एअर चीफ मार्शल फली मेजर आणि धनोआ यांनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवलेले आहे. अर्थात् ते मोदीद्वेषाने आंधळ्या झालेल्या स्वघोषित विचारवंत लोकांना कळत नाही किंवा त्यांना ते कळू घ्यायचे नाही. देशातील सर्वसामान्य नागरिकाला मात्र ते स्पष्ट दिसते, कळते, जाणवते आणि म्हणूनच १० वर्षे झाली, तरी मोदींचा व्यक्तीगत जनाधार न्यून होत नाही अन् हे तथाकथित विचारवंत लोक मात्र अधिकाधिक ‘इररेलेव्हंट’ (असंबद्ध) होत चालले आहेत !

– सौ. शेफाली वैद्य, पुणे. (७.५.२०२५)