दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची चेतावणी !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे

मुंबई – राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक तर होतेच; पण त्या जोडीला आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. दूध आणि दूधजन्य पदार्थांमधील भेसळीच्या विरोधात प्राधान्याने कारवाई केली जाईल, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुग्ध व्यवसायाच्या शिष्टमंडळाशी बोलतांना दिली. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ, ज्येष्ठ संचालक श्रीपाद चितळे, आबासाहेब थोरात यांनी मुंढे यांची भेट घेतली. त्या वेळी ही भेसळ थांबवण्यावर सविस्तर चर्चा झाली.

अन्न आणि औषध विभागाच्या प्रयोगशाळांची क्षमता अन् संख्या वाढवण्याचे नियोजन आहे. निकृष्ट पनीरच्या विरोधात मोठी कारवाई चालू आहे. त्यामुळे दुधापासून बनवलेल्या पनीरला बाजारपेठेत मागणी वाढलेली आहे. ग्राहकांना निर्भेळ उत्पादने मिळायला हवीत. ग्राहकांना चांगले दूध आणि शेतकर्‍याला योग्य तो दर मिळायला हवा, हेच आमचे धोरण आहे. दुधाच्या संदर्भात चुकीचे वागणार्‍यांना थारा मिळणार नाही, असेही मुंढे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

असे धडक आणि कृतीशील धोरण राबवल्यासच भेसळीची समस्या नष्ट होऊ शकते. अशा प्रकारची कारवाई देशभरात व्हायला हवी !