‘९.११.२०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने समस्त रामभक्तांना अपेक्षित असा रामजन्मभूमी खटल्याचा ऐतिहासिक निवाडा दिला. या खटल्यामध्ये तमिळनाडू येथील ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् (वय ९७ वर्षे) यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण होती. त्यांनी ‘रामलल्ला विराजमान’ यांची बाजू ४० वर्षे अत्यंत अभ्यासूपणे आणि गांभीर्याने मांडली. अधिवक्ता के. परासरन् यांची विशेषता, म्हणजे त्यांच्याकडे कायदेशीर कौशल्यासह हिंदु शास्त्रे आणि पुराण यांचे ज्ञानही आहे. त्यामुळेच त्यांना भारताच्या न्यायालयीन क्षेत्रात ‘भारतीय बार कौन्सिलचे पितामह’ असे म्हटले जाते. ‘रामजन्मभूमी’ आणि ‘शबरीमला येथील मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास मनाई’ हे दोन खटले त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक ठरले आहेत. अशा अधिवक्ता के. परासरन् यांचा गुणपरिचय येथे देत आहोत.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. भगवान श्रीरामाविषयी आध्यात्मिक ओढ !
अधिवक्ता के. परासरन् यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९२७ या दिवशी तमिळनाडूतील श्रीरंगम् येथे झाला. त्यांचे वडील केशव अय्यंगार हेही एक अधिवक्ता आणि वैदिक विद्वान होते. अधिवक्ता के. परासरन् यांना लहानपणापासून भगवान श्रीरामाविषयी आध्यात्मिक ओढ होती. ते वयाच्या ७ व्या वर्षापासून सतत रामायणपठण करतात. भगवान श्रीरामावरील भक्ती आणि समर्पण यांमुळे ते वर्ष २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमी-बाबरी ढाचा वाद खटला लढले. त्या वेळी त्यांचे वय ९२ वर्षे होते.
अधिवक्ता के. परासरन् यांचा उल्लेखनीय युक्तीवाद

रामजन्मभूमी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अधिवक्ता के. परासरन् यांनी युक्तीवाद केला, ‘कोणत्याही जागेला मंदिर मानण्यासाठी तेथे मूर्ती असण्याची आवश्यकता नाही. अयोध्येत मूर्ती ठेवण्यापूर्वी आणि मंदिर होण्यापूर्वीपासून तेथे श्रीरामाची पूजा केली जात होती. हिंदु धर्मात सूर्य, नद्या आणि पर्वत यांचीही पूजा केली जाते.’
प्रसिद्धी पराङ्मुखता !
रामजन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकल्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी या प्रकरणात माझे सर्वोत्तम प्रयत्न केले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतः निवाडा दिला. मला अधिक काही सांगायचे नाही.’’
२. अधिवक्ता परासरन् यांच्या कार्याचा परिचय
अधिवक्ता के. परासरन् हे प्रख्यात हिंदु विद्वान आणि उत्कृष्ट सरकारी अधिवक्ता आहेत. वर्ष १९७६ मध्ये ते तमिळनाडू राज्याचे ‘महाधिवक्ता’ होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात ते भारत सरकारचे ‘महाधिवक्ता’ होते. त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन त्यांना वर्ष २००३ मध्ये केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’, तर वर्ष २०११ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले. वर्ष २०१२ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना ६ वर्षांसाठी राज्यसभेचे सदस्यत्व बहाल केले होते. वर्ष २०१६ नंतर वार्धक्यामुळे काही अपवाद सोडले, तर ते सर्वाेच्च न्यायालयात क्वचितच उपस्थित राहिले.
वाजपेयी सरकारने राज्यघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अधिवक्ता के. परासरन् यांची ‘मसुदा आणि संपादकीय समिती’चे सदस्य म्हणून नियुक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’ची स्थापना करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांना या न्यासाचे पहिले विश्वस्त म्हणून नियुक्त केले.
अधिवक्ता के. परासरन् यांनी रामजन्मभूमी सुनावणीच्या वेळी अनुभवलेले काही दैवी अनुभव

विरोधी पक्षाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुष्कळ धारिकांमधील एकाच धारिकेतील आवश्यक असलेल्या उत्तराचे पान उघडले जाणे : एकदा विरोधी पक्षाने सुनावणीच्या वेळी ‘दशरथाच्या राजवाड्यात प्रसुती कक्ष होता का ?’, असा प्रश्न विचारला. न्यायाधिशांनी मला तपशील सादर करण्यास सांगितले.
|
खटल्याच्या पुष्कळ धारिका रचलेल्या होत्या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे ? याचा विचार करतांना लक्षात आले की, सर्व धारिका उभ्या रचल्या गेल्या आहेत. त्यातील एक धारिका आडवी आहे. मी साहाय्यकाला आडवी धारिका काढायला सांगितली. माझ्याकडून नेमके तेच पृष्ठ उघडले, जे आवश्यक होते. (याविषयी भावपूर्वक सांगतांना अधिवक्ता के. परासरन् म्हणाले की, त्याचे वर्णन करता येत नाही; पण अनुभवता येते. – संकलक) दुसर्याच दिवशी सुनावणीत न्यायालयाकडून हिंदूंच्या बाजूने म्हणजेच ‘श्रीरामजन्मभूमी प्रभु श्रीरामाचीच आहे’, असा निकाल घोषित करण्यात आला.
३. अधिवक्ता के. परासरन् यांची जिद्द, चिकाटी आणि खटल्याचा इत्थंभूत अभ्यास !
अधिवक्ता के. परासरन् यांचा अयोध्या खटल्याचा इतका अभ्यास होता की, ते अनेकदा न्यायालयासमोर या खटल्यातील महत्त्वाचे दिनांक अगदी बोलता बोलता सहज सांगायचे. ‘कोणत्या दिवशी काय घडले होते ?’, हे अधिवक्ता के. परासरन् बोटांवर आकडेमोड करून सांगायचे. त्यांनी ‘अयोध्या’ या विषयावर एवढे संशोधन आणि वाचन केले आहे की, त्याच्यावरच एक पुस्तकच लिहिता येईल.
|
अधिवक्ता के. परासरन् यांच्या साहाय्यासाठी असलेल्या युवा अधिवक्त्यांच्या एका समूहाने रामजन्मभूमीच्या खटल्यामध्ये काम केले. ते युवक म्हणाले की, ९२ वर्षांचे अधिवक्ता के. परासरन् यांची खटल्याच्या सुनावण्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि अभ्यास पाहून त्यांनाही हुरूप यायचा. अधिवक्ता परासरन् गेल्या ४० वर्षांपासून या खटल्यावर काम करत आहेत; पण त्यांनी एकदाही पराभव स्वीकारला नाही. त्यामुळेच कदाचित् सर्वाेच्च न्यायालयाचे बार असोसिएशनचे बहुतेक सदस्य अधिवक्ता के. परासरन् यांना त्यांचे ‘गुरु’ मानतात.
४. शांत आणि संयमी अधिवक्ता के. परासरन् !

रामजन्मभूमी खटल्याविषयी अधिवक्ता के. परासरन् आणि त्यांचा चमू यांना अनेक लोक ‘ई-मेल’, ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘संदेशवाहक’ यांच्याद्वारे विविध सल्ले देत. त्यामुळे त्यांचे काही सहकारी चिडून म्हणायचे, ‘अशा लोकांनाच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उभे केले पाहिजे.’ त्यावर अधिवक्ता के. परासरन् नेहमी म्हणायचे की, ‘लोक अयोध्या प्रकरणाला स्वतःचा खटला समजतात. त्यांच्या सूचना सकारात्मकतेने घ्या.’ यानंतर ‘लोक काहीही चुकीचे बोलत नव्हते’, असे सहकार्यांच्या लक्षात आले. अयोध्या सुनावणीकाळात अधिवक्ता के. परासरन् आणि मुसलमान पक्षाची बाजू मांडणारे अधिवक्ता राजीव धवन यांचा युक्तीवाद झाला होता. खटल्याच्या शेवटच्या सुनावणीच्या वेळी धवन यांनी हिंदु पक्षाची बाजू मांडणार्या अधिवक्त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या श्रीराममंदिराच्या आराखड्याची प्रत न्यायालयात फाडली, तेव्हाही अधिवक्ता के. परासरन् शांत आणि संयमी होते.

५. श्रीरामजन्मभूमी खटल्याविषयी समरसता
रामजन्मभूमी खटल्यात स्वतःची बाजू मांडण्याआधी अधिवक्ता के. परासरन् यांनी प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. ते खटल्यासंबंधीचे वाचन, अभ्यास आणि कार्य प्रतिदिन सकाळी १०.३० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत करत. त्यांना सुनावणीच्या वेळी प्रभु श्रीराम सर्वत्र उपस्थित असल्याचे जाणवत होते. श्रीरामाविषयी आत्यंतिक श्रद्धा असल्याने त्यांनी सुनावणीच्या वेळी एकदाही बसण्यास नकार दिला, तसेच पादत्राणे न घालता सलग ५ दिवस प्रतिदिन ४ घंट्यांहून अधिक काळ प्रभावीपणे युक्तीवाद केला. या वेळी सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ता राजीव धवन यांनी सुचवले की, प्रकरणाची दैनंदिन सुनावणी अधिवक्ता परासरन् यांच्यासाठी कंटाळवाणी ठरू शकते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी मरण्यापूर्वी या प्रकरणावरील युक्तीवाद पूर्ण करावेत, अशी माझी एकमेव इच्छा आहे.’’
अधिवक्ता के. परासरन् यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थ झाल्याचे भाव पहा !![]()
|
अधिवक्ता परासरन् यांचे सहकारी अधिवक्ता श्रीधर पोतराजू म्हणाले,

‘‘रामजन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील ४० दिवसांच्या युक्तीवादात अधिवक्ता के. परासरन् यांची या प्रकरणाप्रतीची वचनबद्धता एका महाऋषीने केलेल्या यज्ञासारखी होती.’ त्यांच्या मनात सतत २४ घंटे कायदेशीर प्रस्ताव आणि रणनीती यांचे विचार चालू होते. शबरीमाला प्रकरणात भगवान अयप्पा यांच्या बाजूने युक्तीवाद करतांना अधिवक्ता के. परासरन् यांनी धर्मग्रंथांचे संदर्भ दिले.’’ एका वार्तालापात ते गंमतीने म्हणाले, ‘‘वर्ष १९४९ मध्ये मी माझी पहिली पत्नी सरोजा हिच्याशी लग्न केले खरे; पण वकिलीच्या नोंदणीनंतर मी ‘कायदा’ या नावाने दुसर्या पत्नीशी लग्न केले.’’