
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ६ मे या दिवशी दिनांकानुसार वाढदिवस होता. याच दिवशी सायंकाळी तमिळनाडूमधील कांचीपूरम् येथे असतांना पुष्कळ जोराचा वादळी वारा सुटला होता. हा वारा इतका जोराचा होता की, ‘युद्ध चालू होईल आणि हे भारत-पाक युद्धाच्या माध्यमातून तिसर्या महायुद्धाची नांदीच आहे’, अशी शक्यता वाटत होती. या वेळी मला असेही जाणवले की, कांचीपूरम्मध्ये हे वादळ जोराने वहात आहे, याचा अर्थ श्री कामाक्षीदेवी या युद्धात सहभागी होणार आहे. (कांचीपूरम् हे श्री कामाक्षीदेवीचे स्थान आहे.) ‘कांचीपूरम् हा ब्रह्मांडातील देवीलोक आहे आणि तीच युद्धात सहभागी आहे कि काय ?’, असे जाणवले.
यासह माझ्या समवेत सेवा करणारे श्री. विनीत देसाई आणि श्री. स्नेहल राऊत हे दोन्ही साधक चेन्नई येथून कांचीपूरम्ला ६ मे या दिवशी सायंकाळी येत होते. त्यांना वाटेत विजांचा कडकडाट आणि लखलखाट दिसला. एका क्षणी एक वीज चमकतांना विजेचा आकार त्रिशुळासारखा दिसला. यातून ‘पुढची मोहीम म्हणजे ‘ऑपरेशन त्रिशुल’ असेल कि काय ?’, असे वाटले.
७ मे या दिवशी सकाळी जेव्हा भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘एअर स्ट्राईक’ केल्याचे कळले, तेव्हा मला वरील अनुभूतीचा उलगडा झाला. यासह भारतीय सैन्याने केलेल्या या मोहिमेचे नाव ‘आपॅरेशन सिंदूर’ असे ठेवले होते. यातील ‘सिंदूर’ हा शब्द कुंकवाशी संबंधित आहे आणि सात्त्विक कुंकूच्या उत्पत्तीचे स्थान कांचीपूरम्मध्ये आहे. यातून श्री कामाक्षीदेवीच्या स्थानाचा आणि मोहिमेच्या नावाचा उलगडा झाला.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (७.५.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |