साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !

कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर

१. साधकांना आधार वाटणे 

‘सौ. जयश्री क्षीरसागरकाकू यांच्यातील ‘तत्परता आणि प्रेमभाव’, या गुणांमुळे मला त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा. पूर्वी जिल्ह्यात ‘विज्ञापने मिळवणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, धर्मरथाशी संबंधित सेवा’, या सेवा उपलब्ध असायच्या. या सेवा करण्यासाठी साधकसंख्या अल्प असायची. त्या काळात सेवांमध्ये सहभागी असणार्‍या साधकांसाठी काकू अल्पाहार आणि जेवण, तसेच कोरडा खाऊ बनवून द्यायच्या. क्षीरसागरकाका (श्री. श्रीकांत क्षीरसागर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७६ वर्षे) ८ कि.मी. लांबून डबे आणि खाऊ आणून द्यायचे. एकदा त्यांनी गॅस सिलेंडरही आणून दिले होते. तेव्हा मला काकूंचा पुष्कळ आधार वाटायचा. त्यांनी या सेवांना कधीही ‘नाही’ म्हटले नाही.

२. मुलीच्या आध्यात्मिक प्रगतीचे श्रेय गुरूंना देणे

अ. काकूंची मुलगी सुश्री अंजली (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४५ वर्षे) ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करते. वर्ष २०११ मध्ये तिची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याचे कळल्यावर मी आणि माझ्या यजमानांनी काकूंना भ्रमणभाष केला होता. त्या वेळी आम्ही त्यांना म्हणालो, ‘‘अंजलीताईचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.’’ तेव्हा त्या केवळ हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘तिला गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी अर्पण केले आहे. त्यांचीच कृपा आहे.’’

सौ. नम्रता विनय शास्‍त्री

आ. वर्ष २०२४ मध्ये गोवा येथे ‘ब्रह्मोत्सव’ झाला. या ब्रह्मोत्सवाच्या वेळी एक लाकडी रथ बनवण्यात आला होता. रथ बनवण्याच्या सेवांचा समन्वय अंजलीकडे होता. रथ बनवण्याच्या सेवेतील तिच्या सहभागाबद्दल व्यासपिठावर बोलावून तिचा परिचय करून देण्यात आला होता. त्याविषयी मी काकूंना भ्रमणभाष केला होता. तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘सर्व गुरुदेवांची कृपा आहे. तेच सर्व करून घेतात.’’ त्या कधीही अंजलीचे अवास्तव कौतुक करत नसत.

३. भजनांतून देवाला आळवणे

त्या पूर्वी भजने म्हणायला जायच्या. त्या म्हणायच्या, ‘‘मी भजन म्हणत असतांना देवाशी अगदी एकरूप होऊन जाते. मला कशाचीही आठवण रहात नाही. ‘मी देवाच्या अगदी जवळ आहे. त्याच्या चरणांपाशी बसले आहे’, असे मला वाटते.’’

४. त्यांच्या मनात श्रीरामाच्या दर्शनाची आत्यंतिक ओढ होती. शेवटी त्यांनी अयोध्येत रामाच्या चरणांपाशीच चिरविराम घेतला. (अयोध्या येथे त्यांचे निधन झाले.)’

– सौ. नम्रता विनय शास्त्री (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा. (१४.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक