पाकिस्तानला निष्प्रभ करण्याची भारताला नामी संधी !

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. पाकिस्तान सध्या चहुबाजूंनी विविध संकटांनी वेढला आहे. याचा लाभ घेत पाकला अद्दल घडवता येऊ शकते. यामुळे भारतासमोर पाकिस्तानला निर्णायक धक्का देण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पाकिस्तानची सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख ‘आतंकवाद्यांचे आश्रयस्थान’ अशीच आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे ३ तुकडे करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी असलेले मार्ग आणि उपाययोजना यांचा घेतलेला आढावा…

७ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘साम्यवादी-उदारमतवादी यांचा धोका, पाकिस्तानची आर्थिक आणि सामाजिक घसरण, भारतीय हवाई दल आणि नौदल यांची सामरिक दबाव निर्माण करणारी पावले, लष्करी डावपेच अन् भारताची पाकिस्तानविरोधी व्यापक कृती योजना’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/911105.html

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे.

७. पाकला ‘आतंकवाद समर्थक देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक !

पाकिस्तान (‘आतंकवाद समर्थक देश’)

‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’त पाकिस्तानला ‘आतंकवादाला आश्रय देणारा देश’ म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी भक्कम पुरावे आणि सुरक्षा परिषदेच्या प्रमुख सदस्यांचा पाठिंबा मिळवणे महत्त्वाचे आहे. जर हे यशस्वी झाले, तर पाकवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले जाऊ शकतात आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडू शकतो.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

८. पाकिस्तान सैन्यप्रमुखांना ‘आतंकवादी’ घोषित करणे

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अनेकदा चिथावणीखोर विधाने करून आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पत्नीने पाकिस्तान सोडून लंडनमध्ये आश्रय घेतल्याचे उदाहरण हे तेथील असुरक्षित वातावरणाचा भक्कम पुरावा आहे. त्यामुळे या प्रमुख व्यक्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आंतकवादी घोषित करणे’, हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

९. पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेला धक्का देणे

पाकिस्तानमध्ये सध्या शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि सुटे भाग यांची कमतरता आहे. उपकरणे जुनी झाली आहेत आणि सैनिकांमध्ये मनोबलाचा अभाव आहे. याचा लाभ घेत भारताने पाकिस्तानच्या आतंकवादी आणि लष्करी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या क्षमतेला धक्का द्यावा. नवीन शस्त्रे विकत घेण्यासाठी पाकिस्तानला मोठे कर्ज काढावे लागेल. त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादा लक्षात घेता जर भारताशी संघर्ष झाला, तर पाकिस्तानला कर्ज घेऊन लढावे लागेल, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद होईल.

१०. आर्थिक युद्ध

पाकिस्तानच्या आर्थिक साहाय्यावर प्रहार करणे, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून येणार्‍या साहाय्यांवर दबाव टाकणे आणि व्यापार निर्बंध लादणे, या मार्गांनी पाकिस्तानचे आर्थिक संकट अधिक तीव्र केले जाऊ शकते. ‘अटारी करार’ रहित केल्यामुळे झालेल्या आर्थिक हानीचे उदाहरण समोर आहे. व्यापाराच्या पुरवठा मार्गांना बाधा आणणे, पाकशी असलेल्या व्यापार करारांची पुनर्रचना करणे किंवा त्यांच्यावर निर्बंध लादणे, हासुद्धा भारताच्या धोरणाचा भाग असू शकतो. भारताने पाकिस्तानच्या पुरवठा साखळीत असलेल्या त्रुटींचा लाभ घेत त्यांचे ‘लॉजिस्टिक नेटवर्क’ (मालाची वाहतूक, साठवणूक आणि वितरण यांची योजना) कमकुवत करणे, हीसुद्धा एक प्रभावी रणनीती ठरू शकते. यामुळे लष्करी आणि नागरी क्षेत्रात असलेला गोंधळ वाढू शकतो.

११. ‘सिंधु जल करारा’चा वापर

‘सिंधु जल करार

सिंधु जल करारात पालट करण्याचा मुद्दा उपस्थित करून भारताने पाकिस्तानवरचा दबाव वाढवला आहे. जर भारताने पाण्याचा वापर आपल्या हितासाठी वाढवला, तर पाकिस्तानची अन्न सुरक्षा आणि जलसंपत्ती धोक्यात येऊ शकते.

१२. बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा

बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्ष समर्थन देऊन भारत पाकिस्तानला अंतर्गत अस्थिर करू शकतो. सध्या बलुचिस्तानमध्ये असलेल्या वाढत्या असंतोषामुळे पाकची अंतर्गत एकता धोक्यात आली आहे. गुप्त कारवायांच्या माध्यमातून पाकमधील बंडखोर चळवळींना माहिती, साधने आणि अप्रत्यक्ष समर्थन देणे शक्य आहे. यामुळे पाकच्या लष्करी आणि नागरी ढाच्याला धक्का पोचवता येईल.

१३. सायबर युद्ध

पाकच्या आर्थिक, वित्तीय आणि लष्करी नेटवर्कवर सायबर आक्रमण करून त्यांच्या कमकुवत प्रणालींना लक्ष्य करणे, हे सायबर युद्धाचे उद्दिष्ट असावे. यामुळे पाकची दैनंदिन यंत्रणा विस्कळीत होऊ शकते.

१४. पाकिस्तानचे अणूबाँबच्या भीतीचे निराकरण

पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या धोक्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजावाजा करण्यात तो स्वतःच व्यस्त आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रभावी वापर करून पाकवर दबाव आणावा, जेणेकरून त्यांच्या अण्वस्त्र धोरणावर आंतरराष्ट्रीय दृष्टी राहील आणि कोणतीही आक्रमक कारवाई टाळली जाईल.

१५. पाकिस्तानमधील अंतर्गत अस्थिरता

पाकिस्तान सध्या गंभीर अंतर्गत संकटात आहे. देशभरात अनेक ठिकाणी हिंसक चळवळी चालू आहेत. अनुमाने ५० टक्के प्रदेश अशांत आहेत. सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने चालू असून त्यामुळे त्याच्या सुरक्षेला गंभीर धोकाच निर्माण झाला आहे.

१६. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवणे आवश्यक !

पाकच्या असुरक्षिततेचा लाभ घेत त्याच्या आतंकवादी पायाभूत सुविधा नष्ट करून भारताने एक प्रभावी बहुक्षेत्रीय रणनीती वापरणे आवश्यक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारत सरकारने राबवलेल्या विकास योजनांमुळे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

ज्याप्रमाणे आज काश्मीरमध्ये पालट घडवून आणले, त्याच ठिकाणी पाकिस्तानलाही कायमस्वरूपी धडा शिकवणे आवश्यक आहे, जेणेकरून तो भारतविरोधी कारवाया पुन्हा करण्याचे धाडस करणार नाही.   (समाप्त)

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.