जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. पाकिस्तान सध्या चहूबाजूंनी विविध संकटांनी वेढला आहे. याचा लाभ घेत पाकला अद्दल घडवता येऊ शकते. यामुळे भारतासमोर पाकिस्तानला निर्णायक धक्का देण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पाकिस्तानची सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख ‘आतंकवाद्यांचे आश्रयस्थान’ अशीच आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे ३ तुकडे करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी असलेले मार्ग आणि उपाययोजना यांचा घेतलेला आढावा…

१. साम्यवादी-उदारमतवादी यांचा धोका
काश्मीर खोर्यातील अंतर्गत सुरक्षा परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने केंद्र सरकारच्या अनुमतीविना काही संवेदनशील पर्यटनस्थळे खुली केली आणि त्यानंतर लगेचच आतंकवादी आक्रमण झाले. यामागे कुणाचा हात होता, याचे अन्वेषण करण्याची आवश्यकता आहेच. यातून शत्रूचे लागेबांधे देशात खोलवर रुजल्याचे संकेत मिळत आहेत. भारताविरोधात काम करणार्या शक्तींना थेट पाठिंबा देणारे, त्यांच्या कारवायांचे गांभीर्य न्यून करणारे आणि लोकशाही संस्थांचा दुरूपयोग करणारे साम्यवादी-उदारमतवादी हे देशासाठी धोकादायक सिद्ध होत आहेत. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करायचे असेल, तर या विचारधारेच्या प्रभावाला रोखले पाहिजे.
२. पाकिस्तानची आर्थिक आणि सामाजिक घसरण

पाकिस्तान सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. बलुचिस्तानातील स्वातंत्र्य चळवळीने पाक लष्कराची नाचक्की झाली आहे. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी पाठ फिरवल्यामुळे पाकवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अशा परिस्थितीत जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी काश्मीरच्या भावनिक सूत्राला हात घालण्याचा त्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.
३. पाक लष्करप्रमुखांची प्रक्षोभक विधाने

पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ‘हिंदु-मुसलमान कधीच एकत्र येऊ शकत नाहीत अन् आम्ही काश्मीर मुक्त केल्याविना स्वस्थ बसणार नाही’, अशी गरळ ओकली. ही विधाने पाकच्या आतंकवादी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. पहलगाम हत्याकांडाचा मुहूर्तही अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांच्या भारतभेटीची वेळ साधून निवडला गेला होता, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
४. भारतीय हवाई दल आणि नौदल यांची सामरिक दबाव निर्माण करणारी पावले
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात गस्त, युद्धसराव आणि गोळीबार करण्याचे सत्र चालू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाला सातत्याने ‘हाय अलर्ट’वर रहावे लागत आहे. या तणावामुळे पाकवरील आर्थिक आणि मानसिक ताणही वाढत आहे. सीमेवरील हवाईतळांवर भारतीय हवाई दलाने ‘मॉक फायरिंग’चा (आपत्कालीन स्थितीतील गोळीबाराचा सराव चालू केला आहे. त्यामुळे पाकचे हवाई दलालही ‘हाय अलर्ट’वरच आहे. या काळातील सततच्या उड्डाणांमुळे प्रचंड व्यय होतो, जो पाकसारख्या देशासाठी मोठा आर्थिक भार आहे.
४ अ. भारतीय लष्कराच्या पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम सीमांवरील हालचाली : भारतीय लष्कराने पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम कमांडच्या माध्यमातून सीमेवर विविध प्रकारच्या युद्ध सरावाची सिद्धता चालू केली आहे. यामुळे पाकिस्तानने तिथेही त्याचे सैन्य तैनात केले आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक आणि मानसिक दबावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
४ आ. पाकवरचा वाढता आर्थिक बोजा : पाकने चीनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी चालू केली आहे; कारण पाकच्या अनुमाने ५० टक्के शस्त्रास्त्रांची कार्यक्षमता निकृष्ट दर्जाची आहे. या खरेदीमुळे पाकच्या आर्थिक संकटात अधिक भर पडेल.
५. लष्करी डावपेच

सध्याच्या भारतीय लष्करी डावपेचांचा उद्देश पाकिस्तानी सैन्याला सतत ‘हाय अलर्ट’वर ठेवून थकवणे आणि नंतर निर्णायक आक्रमण करणे, हा आहे. भारतीय सैन्याची शक्ती आणि सहनशक्ती पाकच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक आहे. योग्य वेळी कारवाई केल्यास भारत पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवू शकतो.
६. भारताची पाकिस्तानविरोधी व्यापक कृती योजना
भारताने पाकिस्तानला लक्ष्य करणारी एक व्यापक आणि सर्वसमावेशक कृती योजना आखली आहे. यामध्ये राजकीय, लष्करी, आर्थिक आणि गुप्तहेर कारवाया यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय समर्थनाचा योग्य उपयोग करून भारताला आपली उद्दिष्टे साध्य करावी लागतील. अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. केवळ चीन आणि तुर्कस्तान हे भारताच्या विरोधात उभे आहेत. या जागतिक पाठिंब्याचा भारताने प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. (क्रमश:)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/911333.html