Karnataka Hindu Activist Murdered : मंगळुरूमध्ये हिंदु कार्यकर्त्याची हत्या

दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये पाळण्यात आला बंद

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सुहास शेट्टी

मंगळुरू (कर्नाटक) : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू शहरात १ मे या दिवशी संध्याकाळी सुहास शेट्टी या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. सुहास शेट्टी यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येतील आरोपी फाजिल याच्या हत्येचा आरोप होता, तसेच त्यांच्या विरोधात अन्यही गुन्हे नोंद होते.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ मेच्या रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी किनीपाडवू क्रॉस येथे सुहास शेट्टी यांची हत्या करण्यात आली. सुहास शेट्टी हे संजय, प्रज्वल, अन्वित, लतीश आणि शशांक यांच्यासमवेत चारचाकी वाहनातून प्रवास करत होते. त्या वेळी अन्य चारचाकी वाहनांतून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी त्यांचे वाहन थांबवले आणि सुहास शेट्टी यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी वार केले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेल्यावर तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

२. या हत्येतील आरोपींची ओळख पोलिसांना पटली असून त्यांच्या अटकेसाठी काही पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

३. सुहास शेट्टी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी मंगळुरूमध्ये ६ मे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सुहास यांच्या पार्थिवावर २ मे या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

४. या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषदेने २ मे या दिवशी दक्षिण कन्नड जिल्ह्यात बंद पाळण्याचे आवाहन केले. मंगळुरू आणि मुल्की येथे अनेक खासगी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली, तर काही ठिकाणी रस्ते रोखण्यात आले. जिल्ह्यात बससेवा विस्कळीत झाली. बंदच्या आवाहनानंतर सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.

५. कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, या क्रूर कृत्यामुळे समुदायाला मोठा धक्का बसला आहे. गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नाही, असे दिसते आणि असे जघन्य गुन्हे राज्यातील बिघडलेली कायदा अन् सुव्यवस्थेची परिस्थिती दर्शवतात. मी राज्य सरकारने दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करतो.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये गेल्या अनेक वर्षांत हिंदु कार्यकर्त्यांना वेचून वेचून ठार मारले जात असतांना त्यांच्या संरक्षणासाठी काहीच उपाय योजले जात नाहीत. या संदर्भात हिंदु संघटनांनी सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे !