Indus Water Treaty : सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकला जाणारे पाणी रोखण्यासाठी ३ टप्प्यांत प्रयत्न होणार !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर व केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील

नवी देहली – पाकिस्तानला सिंधु जल करारांतर्गत देण्यात येणारे पाणी थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न चालू केले आहेत. या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवसास्थानी बैठकही आयोजित केली होती. यात परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील सहभागी झाले होते. यात हे पाणी ३ टप्प्यांत थांबवण्याचे नियोजन करण्यात आले; मात्र हे ३ टप्पे कोणते, हे सांगण्यात आले नाही. या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील म्हणाले की, या संदर्भात ३ प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याद्वारे पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.

आम्ही कधीही सिंधु जल कराराच्या बाजूने नव्हतो ! – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरचा विचार केला, तर आम्ही कधीही सिंधु जल कराराच्या बाजूने नव्हतो. आमच्या लोकांसाठी सिंधु जल करार हा सर्वांत चुकीचा करार आहे, असे आमचे नेहमीच मत आहे. हे काश्मीरसाठी हानीकारक आहे.