प्रसादाच्या लाडवात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंदवा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात केला जाणारा हा प्रकार म्हणजे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दादर (पू.) रेल्वेस्थानकाजवळ आंदोलन करतांना मंदिर महासंघाचे सदस्य, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

मुंबई – जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केली. त्यानंतर जगभरातील हिंदु समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना श्री तिरुपती बालाजी मंदिराचे पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते. मंदिराच्या विश्वस्तपदी ख्रिस्ती व्यक्तींना नेमले गेले होते. मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले, आदी अनेक पापे त्या काळात करण्यात आली. त्याचाच पुढचा भाग म्हणजे या प्रसादाच्या लाडवात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले, असे प्रतिपादन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.

‘ज्यांनी हे महापाप केले आहे, त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंदवून त्यांना तात्काळ अटक करावी’, अशी मागणीही त्यांनी केली. याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबई येथील दादर (पू.) रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सदस्यांसह,भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली सूत्रे

१. केवळ या प्रसादाच्या लाडवाच्याच प्रकरणाची नव्हे, तर जगनमोहन रेड्डी सरकार आणि त्यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपति मंदिराशी निगडित घेतलेल्या सर्वच निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यातील जे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले असतील, ते सर्व तात्काळ रहित करण्यात यावेत, अशी महासंघाची आंध्रप्रदेश सरकारकडे मागणी आहे.

२. हे प्रकरण म्हणजे मंदिर सरकारीकरणाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणता येईल. देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये अशा प्रकारे धर्मभ्रष्टता वा हिंदु धर्मविरोधी कृती होत नाहीत ना, याची पडताळणी करण्याची वेळ आली आहे.

३. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये कावड यात्रेत सहभागी भक्त जे हॉटेल वा ढाबा येथे थांबत होते, त्यांच्या जेवणामध्ये थुंकणे, लघुशंका करणे आदी विकृती समोर आल्या होत्या. तसेच अनेक मंदिरांच्या बाहेर देवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि हार यांनाही थुंकी लावण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. केवळ ‘थुंकी जिहाद’च नव्हे, तर सध्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरापासून केरळमधील अनेक मंदिरांमधील देवाचा प्रसाद हा ‘हलाल उत्पादनां’पासून बनवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

४. धर्मपरायण हिंदू हे कदापि सहन करू शकत नाहीत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला धर्माचरणाचे स्वातंत्र्य दिले असतांना त्यात अशा प्रकारे बाधा आणणे, हा गंभीर अपराध आहे. हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण करणे, हे सरकारचे दायित्व आहे.

५. मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच; मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा, अशी मागणी करण्याची वेळ आज आली आहे. यासाठी हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी.