पालघरच्या उपजिल्हाधिकार्‍यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

पालघर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे स्थानांतर होऊनही त्यांनी पदभार सोडला नव्हता. पथकाने सापळा रचून त्यांना त्यांच्याच कार्यालयातच अटक केली. पालघरमधून राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथे त्यांचे स्थानांतर झाले होते; मात्र १ वर्ष वाढवून मिळण्यासाठी ते प्रयत्नशील होते.

आदिवासी खातेदारकाची भूमी नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार संबंधित प्रकरण संमत करण्यासाठी जाधवर यांच्याकडे गेले होते; पण त्या मान्यतेसाठी त्यांनी लाच मागितली. तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका

अशा लाचखोर अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !