आंबेवाडी (तालुका कर्जत) येथे ३ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित !

महावितरणच्या अधिकार्‍यांना जागे करण्यासाठी ग्रामस्थांचा ‘बँड बाजा मोर्चा’

कर्जत – तालुक्यात नेरळमधील आंबेवाडीतील वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. (महावितरणच्या अधिकार्‍यांना या विषयी जाब विचारून दंडित केले पाहिजे !  – संपादक) तक्रारीसाठी महावितरणच्या कार्यालयात दूरभाष केल्यास कुणी उचलत नाही आणि उचलाच, तर त्याची नोंद घेत नाहीत. त्यामुळे संतप्त  स्थानिकांनी त्यांचा आवाज ऐकायला जावा; म्हणून बँड बाजा घेऊन महावितरणच्या कार्यालयात वरात काढली. त्या वेळीही महावितरणचा एकही अधिकारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे ‘महावितरण आम्हाला सेवा देणार कि नाही हे त्यांनी स्पष्ट करावे’, असे म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.