पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा आणि त्याचे फलित

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सर्वप्रथम चीनचा ५ दिवसांचा दौरा केला. शाहबाज सरकारने या दौर्‍यासाठी चक्क संसदेत अर्थसंकल्प मांडण्याचा दिनांक लांबणीवर टाकला. या दौर्‍याचे मूळ कारण, म्हणजे अमेरिका आणि सौदी अरेबियाने भुकेकंगाल झालेल्या पाकिस्तानची साथ सोडल्यानंतर चीन हा एकमेव आधार उरला आहे. चीनने ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’च्या (आर्थिक महामार्गाच्या) माध्यमातून पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे कर्ज दिले आहे, तरी या प्रकल्पाला बलुचिस्तानसारख्या भागातून प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे चीन अप्रसन्न झाला आहे. शरीफ यांचा हा दौरा प्रामुख्याने चीनची अप्रसन्नता दूर करण्यासाठीच आखण्यात आला होता. या दौर्‍यानंतरच्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख करून भारताची खोडी काढण्याची संधी साधणे, हा या दोन्ही देशांच्या भारतद्वेषाचा परिपाक आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (डावीकडे ) व पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

१. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी पाकिस्तानला साहाय्य न करण्यामागील कारण

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा चीन दौरा हा अनेक दृष्टीकोनांतून अपेक्षित स्वरूपाचा होता. पाकिस्तानला साहाय्य करणारे काही पारंपरिक दाते आहेत किंवा हातात कटोरा घेऊन भुकेकंगाल पाकिस्तान ज्या देशांच्या उंबरठ्यावर सदोदित जात असतो, असे काही देश आहेत, त्यामध्ये अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्वतःचे वर्चस्व ठेवण्यासाठी वा धार्मिक दृष्टीकोनातून असेल, या दोन्ही देशांनी वेळोवेळी पाकिस्तानला आर्थिक, सामरिक आणि अन्य स्वरूपाचे साहाय्य केल्याचे इतिहासात अनेकदा दिसून आले आहे, किंबहुना ‘पाकिस्तानचे सर्व अर्थकारणच या दोन देशांकडून ताटात पडणार्‍या भाकरीवर अवलंबून होते’, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही; तथापि गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्हीही खंद्या पाठीराख्यांनी पाकिस्तानची साथ सोडली आहे. अफगाणिस्तानातून स्वतःचे सैन्य मागे घेण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची आवश्यकता होती. ही आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने पाकपासून फारकत घेतली. यामागचे एक मुख्य कारण, म्हणजे ११ सप्टेंबर २००१ च्या आक्रमणाचा सूत्रधार असणार्‍या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानने स्वतःच्या कुशीत लपवून ठेवले होते. आबोटाबादमध्ये घुसून लादेनला संपवल्यानंतर अमेरिकेचे पाकसंदर्भातील धोरणच पालटले. याचे आणखी एक कारण, म्हणजे पाकिस्तान हा आतंकवादी निर्माण करणारा कारखाना असल्याचे जागतिक जनमत सिद्ध होऊ लागल्यामुळे अमेरिकेसाठी या देशाची पाठराखण करत रहाणे अवघड होत गेले. सौदी अरेबियाने पाकिस्तानला प्रचंड प्रमाणात साहाय्य केले; परंतु या देशानेही अलीकडील काळात पाकपासून काहीसे अंतर ठेवल्याचे दिसू लागले.

२. पाकची दयनीय आर्थिक स्थिती आणि चीनने त्याला साथ देण्यामागील कारण

या सर्वांचा परिणाम, म्हणजे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय राजकारणातील विश्वासार्हता कमालीची ढासळली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कडेलोटाच्या अवस्थेत आहे. त्यांची परकीय गंगाजळी ५० अब्ज डॉलर्सच्या आसपास पोचली आहे. पाकिस्तानचे मंत्री तेथील जनतेला ‘चहा पिऊ नका, वेफर्स खाऊ नका’, अशा स्वरूपाचे सल्ले देत आहेत; कारण या गोष्टी आयात कराव्या लागतात आणि यासाठीचा पैसा पाककडे नाही. पाकमध्ये महागाईने शिखर गाठले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे चीनपुढे हात पसरण्यावाचून पर्याय नव्हता; कारण चीनने आशिया खंडातील राजकारणाचा भाग म्हणून आणि भारताचा पारंपरिक शत्रू म्हणून पाकची आवश्यकता ओळखली आणि त्याला स्वतःच्या अधीन घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. ‘पाक हा आपला सार्वकालिक मित्र आहे’, अशी घोषणा करण्यापर्यंत चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतःचे मैत्रीसंबंध किती घनिष्ठ आहेत, हे दाखवून दिले होते.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

अर्थात् पाकिस्तान आणि चीन हे शीतयुद्ध काळापासूनचे परस्परांचे मित्र आहेत. या दोघांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे. ‘भारताशी शत्रूत्व’ हा त्यांच्या मैत्रीचा समान आधार आहे; किंबहुना त्यांच्या मैत्रीचा विकास हा भारताशी शत्रूत्वाच्या भावनेतूनच झालेला आहे. या दोन्हीही देशांशी भारताचा सीमावाद असून यातूनच त्याचे त्यांच्याशी युद्धही झालेले आहे. थोडक्यात चीन आणि पाकिस्तान यांच्या भारतासमवेत असणार्‍या संबंधांना संशय, अविश्वास, युद्ध आणि हिंसा यांचा इतिहास आहे. त्यामुळेच या दोन्हीही देशांची मैत्री भारतद्वेषावर टिकलेली आहे. शीतयुद्ध काळापासून चीन आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या पाकला साहाय्य करत आलेला आहे. पाकच्या आण्विक कार्यक्रमाच्या विकासामध्ये चीनचे योगदान मोठे आहे. चीनच्या साहाय्याने पाकने अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र यांचा विकास केलेला आहे. पाकला आवश्यक असणारे अणुतंत्रज्ञान, तसेच अण्वस्त्र बनवण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री यांचा पुरवठा चीनकडून होत आलेला आहे. यासाठी चीनने अनेकदा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे उल्लंघन केलेले आहे.

वर्ष २०१२ मध्ये जेव्हा शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बी.आर्.आय. – व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मिती यांच्याद्वारे आशिया, आफ्रिका आणि युरोप या खंडातील विविध देशांना चीनशी जोडण्याचा प्रकल्प)’ हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. चीनने गेल्या ३ दशकांमध्ये केलेला भरीव आर्थिक विकास आणि औद्योगिक प्रगती यांतून जगाचे ‘उत्पादन केंद्र’ बनण्यापर्यंत मजल मारली; तथापि हा सिद्ध झालेला माल निर्यात करण्यासाठी बी.आर्.आय.ची आखणी करण्यात आली. यात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे चीनच्या शिनशियांग प्रांतापासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्ग विकसित करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ नामक या प्रकल्पावर अनुमाने ५५ अब्ज डॉलर्सहून अधिक पैसा व्यय करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर गेल्या एक दशकापासून काम चालू आहे. यासाठी जवळपास ५३ सहस्र चिनी अभियंते पाकमध्ये आहेत.

३. शाहबाज शरीफ यांनी चीनला भेट का दिली ?

हा प्रकल्प पाकमधील बलुचिस्तान प्रांतातून जातो. या बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी चळवळींनी गेल्या काही वर्षांत जोरदार उठाव चालू केला आहे. पाकमधील विभागीय असमतोल, हे यामागचे मुख्य कारण आहे. बलुचिस्तानमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. असे असूनही बलुचिस्तानला कोणत्याही पद्धतीच्या सवलती पाककडून दिल्या जात नाहीत. त्यांना नेहमी भेदभावाची वागणूक दिली जाते. बलुचिस्तानातील ‘बलुच लिबरेशन आर्मी’कडून चीनच्या ‘सीपेक प्रकल्पा’वर काम करणारे अधिकारी आणि कामगार यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत आणि अलीकडील काळात ते वाढले आहेत. त्यांना आवश्यक ते संरक्षण पुरवण्यात पाकचे लष्कर आणि सरकार यांना पूर्णपणे अपयश येत आहे. या कारणाने चीन कमालीचा अप्रसन्न झाला आहे. अनेकदा चीनने ही अप्रसन्नता व्यक्त केली आहे. या प्रकल्पातून चीनने माघार घेतल्यास पाकिस्तान कोलमडून पडेल; कारण आज पाकला होणारे सर्व आर्थिक साहाय्य चीनच्या माध्यमातून होत आहे. दुसरे म्हणजे चीन हा पाकसाठी भारताच्या विरोधात वापरण्यासाठीचा हुकमी एक्का आहे. अलीकडच्या काळात अनेक ड्रोन्सच्या माध्यमातून अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे बेकायदेशीररीत्या भारतीय हद्दीत टाकण्याचे प्रयत्न पाककडून होत आहेत; किंबहुना पाकच्या हद्दीतून घुसखोरी करून भारतात येणार्‍या आतंकवाद्यांकडे चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आढळली आहेत. यातून चीन पाकला किती मोठ्या प्रमाणावर साहाय्य करत आहे, हे लक्षात येते. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी चीनला भेट दिली.

पाकिस्तान हा जगात सर्वाधिक ‘बेलआऊट पॅकेज’ घेणारा (डबघाईला आलेल्या देशाला अर्थसाहाय्य करण्याची प्रक्रिया) देश आहे. अनेकदा पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्या वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आय.एम्.एफ्.) आणि जागतिक बँक यांनी त्याला साहाय्य केले आहे. यामागे अमेरिकेचा वरदहस्त महत्त्वाचा होता; पण या वेळी अमेरिकेने आखडता हात घेतला आहे. सध्या अनेक विषयांवर तुर्कीयेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे आणि त्याला पाकिस्तानने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सौदी अरेबियानेही पाकिस्तानकडे दुर्लक्ष करण्यास प्रारंभ केला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा एकमेव तारणहार हा सध्या चीन आहे. शाहबाज शरीफ यांचे राजकीय अस्तित्व पाकिस्तानच्या अर्थकारणाचा गाडा सावरण्याच्या कौशल्यावर अवलंबून आहे. यासाठी शरीफ यांना चीनपुढे हात पसरण्याखेरीज गत्यंतरच उरलेले नाही.

४. पाक आणि चीन यांच्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख अन् चीन अन्य देशांशी करत असलेली मैत्री

लेखामध्ये म्हटल्यानुसार, पाक आणि चीन या दोन्ही देशांच्या मैत्रीचा आधारच मुळी भारतद्वेष आहे. त्यामुळे या दौर्‍यानंतर घोषित करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातून त्यांनी भारताला डिवचण्याची संधी सोडली नाही. या निवेदनामध्ये काश्मीरचा उल्लेख करून पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्ष २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा क्रांतीकारी निर्णय भारत सरकारने घेतला होता. या निर्णयावर चीनने आक्षेप घेतला होता. पाकिस्तानसाठी हा निर्णय, ही सर्वांत मोठी चपराक होती. त्यामुळे या दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख होणे, हेही अपेक्षितच होते; पण यामुळे पाकची कशी कोंडी झाली आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.

एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घेतले पाहिजे की, युक्रेनच्या सूत्रावरून जागतिक राजकारणात ध्रुवीकरण होतांना दिसत आहे. यामध्ये ‘जी-७’ आणि अन्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. (‘जी-७’ म्हणजे कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या ७ विकसित देशांचा गट) त्यामुळे अप्रसन्न रशिया चीनच्या अधिक जवळ गेला आहे. चीन आणि पाकिस्तान घनिष्ठ मित्र आहेत. इराणशीही चीनची घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे शीतयुद्ध काळामध्ये असणारे हे देश पुन्हा एकदा एकत्र येतांना दिसत आहेत. अर्थात् यामध्ये पाकिस्तानचे योगदान आता किमान पातळीवर राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी आणि फेसबुक)