सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर राजाराम नरुटे यांची झालेली विचारप्रक्रिया

पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) ‘माझा वाढदिवस साजरा करायला नको’, असे सांगायचे. महर्षींच्या आज्ञेनुसार काही वर्षांपासून त्यांचा जन्मोत्सव साजरा करणे चालू झाले. त्या संदर्भात मला पुढील सूत्रे सुचली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. भगवंताच्या लीला अनुभवू लागल्यानंतर भक्तांना त्याच्या अवतारत्वाची प्रचीती येणे

‘पृथ्वीवर भगवंताचा अवतार होतो, तेव्हा भगवंत ‘मी अवतार आहे’, असे कधीच सांगत नाही. भगवंताच्या लीला अनुभवू लागल्यानंतर भक्तांना त्याची प्रचीती येते. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातही असेच घडले. ‘प.पू. डॉक्टर भगवंत आहेत’, हा भाव साधकांच्या अंतरामध्ये होताच. त्यांच्या कृपेमुळे तो भाव जागृत होऊन वृद्धींगत झाला.

श्री. शंकर नरुटे

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मदिन साजरा केल्यामुळे साधकांना झालेले लाभ

अ. साधकांच्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीच्या भावामध्ये वाढ झाली.

आ. साधकांचा भाव वाढल्यामुळे समाजातील चैतन्य वाढले.

इ. सभोवतालचे रज-तमाचे वातावरण उणावून सत्त्वगुणात वाढ झाली.

ई. प.पू. डॉक्टरांच्या जन्मदिनानिमित्त महर्षी यज्ञविधी करण्यास सांगतात. त्याचाही साधकांना चैतन्याच्या स्तरावर लाभ होतो.

उ. यज्ञाचे चैतन्य सर्व लोकांत पोचल्यामुळे तेथील वातावरण चैतन्यमय होऊ लागले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व अंशात्मक असले, तरी त्याचा समाज आणि साधक यांना अनंत पटींनी लाभ होणे

काही वर्षांपूर्वी मी प.पू. डॉक्टरांविषयी लिहितांना ‘तुम्ही अवतार आहात’, असे म्हटले होते. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘मी अवतार नाही. मी अंशात्मक अवतार आहे.’’ (म्हणजे काही प्रमाणात भगवंताचा अंश माझ्यात आहे.)

कालांतराने महर्षींनी त्यांचे अवतारत्व सिद्ध केले. त्यांच्या अवतारत्वाचा (अंशात्मक असले, तरी त्याचा) समाज आणि साधक यांना अनंत पटींनी लाभ होतो. आता तर ते १०० टक्के ईश्वरावतार असल्याची प्रचीती साधकांना येत आहे. अवतारत्व प्रकट व्हायला योग्य काळ यावा लागतो. आता तो काळ आला आणि भगवंताचे अवतारत्व समाजासमोर सिद्ध झाले.

४. भगवंताचे मोठे अवतारी कार्य

४ अ. गुरुकृपायोगानुसार साधना करून १२७ साधक संतपदी पोचले असून १०५८ साधकांनी ६१ टक्के पातळी गाठणे : प.पू. डॉक्टरांनी २५ वर्षांपूर्वी लावलेले सनातनरूपी एक छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित होऊन ज्याचा लाभ स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर मानवजातीला अनंतपटींनी होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करून (१५.५.२०२४ पर्यंत) १२७ साधक संत झाले, तर १०५८ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. एवढे मोठे कार्य केवळ अवतारी पुरुषच करू शकतात.

४ आ. अनेक साधक जिवांनी पृथ्वीवर जन्म घेऊन प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःचा उद्धार करून घेणे : भगवंत पृथ्वीवर अवतार घेतो, त्या वेळी त्याच्यासमवेत साधना करणारे अनेक जीव पृथ्वीवर अवतरित होतात. त्याप्रमाणे या कलियुगात प.पू. डॉक्टरांसमवेत अनेक साधक जीव पृथ्वीवर जन्माला आले आहेत. तेही प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःचा उद्धार करून घेत आहेत आणि मोक्षाच्या दिशेने विहंगम मार्गाने जात आहेत. हेच भगवंताचे मोठे अवतारी कार्य आहे.’

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.