भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण, चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, सिंध प्रांतातील महाभयंकर आक्रमण आणि महापराक्रमी पृथ्वीराज चौहान राजाचे शौर्य अन् शिरच्छेद’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.    (लेखांक १५)

या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता  https://sanatanprabhat.org/marathi/809931.html

प्रकरण ४

१३. हिंदु स्त्रिया भ्रष्ट होणे आणि त्याची परिणती !

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

आमच्या हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणे, त्यांना आपल्या घरातील रखेल किंवा बायका बनवणे हेही मुसलमान आक्रमकांचे नित्यकर्म होते. अशा आपल्या पत्नीला किंवा बहिणीला सोडवून आणले, तर ‘आपला समाज आपल्यालाच वाळीत टाकील’, असे भय तिच्या आप्तांना वाटे. किंबहुना आता ती भ्रष्ट झाली, तिला आणायची कशी ? असेच त्यांना वाटे. अशी एखादी स्त्री संधी प्राप्त होताच पळून आली, तरी तिची माणसे तिला त्यांच्यामध्ये घेत नसत. या प्रकारे सुमारे १ सहस्र वर्षे अल्प-अधिक प्रमाणात हे प्रकार चालू होते. होते म्हणण्यापेक्षा आजही चालू आहेत.

१४. कुठे कट्टरपंथी मुसलमान आणि कुठे तथाकथित प्रगत समाजवादी !

काश्मिरी पंडितांची, म्हणजे हिंदूंची स्वराज्यातही कशी ससेहोलपट झाली, हे आपण पाहिले आहे. एका मासात शे पन्नास हिंदूंच्या कत्तली दोडा जिल्ह्यात झाल्या, त्या काय दर्शवतात ? हिंदूंचा संहार, स्त्रियांवर अत्याचार आणि मंदिरांचा विध्वंस या गोष्टींना कट्टरपंथी मुसलमान धार्मिक पुण्यकर्म समजतात, तर ‘हिंदुहिताचा विचार करणे, हेसुद्धा जातीय विष आहे’, असे आमचे तथाकथित प्रगत समाजवादी समजत आहेत.

१५. हिंदुत्वाला येणार्‍या मर्यादा !

स्वातंत्र्याच्या प्राप्तीला ६० वर्षे झाली, तरी हिंदूंना हिंदुत्वाचा विचार करायलासुद्धा स्वतःच्या देशात बंदी आहे. रामजन्मभूमीच्याच इमारतीला भ्रष्ट करून बाबरी ढाचा म्हणून म्हणवले गेले. ती रामजन्मभूमी मुक्त करण्याचा उत्स्फूर्त प्रयोग हा जणू एक पुष्कळ मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र या निमित्ताने काश्मीरमध्ये ३० ते ३२ मंदिरे फोडण्यात आली, त्याविषयी कुणीही नक्राश्रू ढाळले नाहीत.

१६. देशाची फाळणी आणि हिंदूंच्या कत्तली

गेल्या शेकडो वर्षांतील या हिंदूंच्या अपरिमित विनाशाचा अंत होण्याची संधी भारताच्या फाळणीच्या निमित्ताने आली होती. दुर्दैवाने देशाची फाळणी झाली. अखंड हिंदुस्थान खंडित झाला. मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान म्हणून जन्माला आले. जीनांना हिंदुस्थानात हिंदूंसमवेत रहायचे नव्हते. त्यांनी हट्टाने ८ कोटी मुसलमानांसाठी म्हणून पाकिस्तान मागून घेतले. आपणही ‘हे अंतर्वैर संपावे’, या भावनेने ते तोडून दिले; परंतु त्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या प्रदेशातील हिंदूंना ज्या क्रूर भयावह पद्धतीने मारून किंवा रक्तबंबाळ करून अत्याचार करून ठार मारण्यात वा हाकलून देण्यात आले, तो प्रकार कितीही विसरावे म्हटले, तरी विसरता येणार नाही. ‘डायरेक्ट ॲक्शन’ (थेट कृती) या दृष्टीने अपकीर्त ठरलेली ती त्रयस्थ चळवळ म्हणजे हिंदूंच्या कत्तलीचाच पद्धतशीर कार्यक्रम होता.

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या पुढील लेख वाचण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/810558.html