गोपालनाचे महत्त्व !

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे. काळाच्या ओघात तिचीच अवहेलना झाल्याने आज सर्वतर्‍हेचे प्रदूषण गंभीररीत्या वाढले आहे. हे वेळीच रोखायचे असेल, तर गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन याला पर्याय नाही. एकप्रकारे गोमाता पंचमहाभूतांच्या कपोेषणाची अधिकारिणी आहे.

प्राचीन काळी भारत धनधान्याने समृद्ध होता आणि या समृद्धीमागील कारण होते गोमाता ! भारताची ही समृद्धी नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी भारतातून गोमातेला नष्ट करण्याचे  षड्यंत्र आखले. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचेच धोरण पुढे चालू ठेवले. याचे फलित म्हणून आज भारतात देशी गायींची संख्या अत्यल्प झाली आहे. विश्वाची माता असलेल्या गायीचे संवर्धन होण्यासाठी तिचे पालन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या अंकात गोपालनाची माहिती जाणून घेऊया.

भारताला पुन्हा समृद्ध बनवण्यासाठी गोसंवर्धन आवश्यक

इंग्रज येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक घरामध्ये गाय होती. प्रत्येक जण गोमातेचे दूध पीत असे. या दुधामुळे माणसे निरोगी, बुद्धीमान आणि बलशाली होती. गोमूत्र आणि गोमय यांचा वापर शेतीमध्ये होत असे. त्यामुळे झाडेझुडुपेही रोगमुक्त आणि सशक्त होती. भारताची अर्थव्यवस्था गोमातेवर आधारित होती. अगदी पुरातन काळापासून भारताची  समृद्धी गोधनावरच अवलंबून राहिली आहे.

आज देशी गोमाता भारतातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे शासनाच्या पाठबळामुळे राजरोसपणे गोहत्या होत आहेत, तर दुसरीकडे दुधाची वाढती मागणी भागवण्यासाठी ‘जर्सी’, ‘होल्स्टिन फ्रिजियन’ यांच्यासारख्या विदेशी गायींची (टीप) मोठ्या प्रमाणावर जोपासना होत आहे. या विदेशी गायींना आपल्या गोमातेची सर येणे अशक्य आहे. यांना ‘काऊ’ (Cow) म्हणणेच सयुक्तिक ठरेल. भारताला पुन्हा समृद्ध बनवायचे असेल, तर या विदेशी गायींचे संवर्धन थांबवून भारतीय गायींचे संवर्धन करायला हवे.

१. वेदांनी वर्णिलेले गायीचे महत्त्व !

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’प्रमाणे विश्वाच्या ग्रंथालयातील सर्वांत पहिले ग्रंथ वेद आहेत. अशा वेदांनी हिंदूंच्या पाच सांस्कृतिक मानबिंदूत जननी, जन्मभूमी, गंगा आणि गायत्री यांसह ‘गोमाते’ला अनन्यसाधारण स्थान दिले आहे. गोमातेविषयी वेदात पुढील उल्लेख आढळतात.

 गोस्तु मात्रा न विद्यते ।
– यजुर्वेद, अध्याय २३, कण्डिका ४८

अर्थ : गायीच्या माध्यमातून होणार्‍या लाभांची इतर कोणत्याही पशूशी तुलना होऊ शकत नाही.

२. गायीमुळे होणारी पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी !

‘त्वंमातासर्वदेवानाम् ।’ अर्थात ‘गाय ही सर्व देवतांची माता आहे’, असे म्हटले जाते. परमपित्याने सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे; कारण गोमाता भूमी, पाणी आणि वायू यांची पुढीलप्रकारे शुद्धी करते.

२ अ. पृथ्वी : गोमय (शेण) आणि गोमूत्र हे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात मिळाले, तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचे उत्पादन करील. आज केवळ रासायनिक निक्षेप (शिल्लक राहिलेले अवशेष) आणि कीटकनाशके यांमुळे अन्न, पाणी अन् वायू यांमध्ये प्रदूषण होत आहे. गोमय आणि गोमूत्र यांमध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात; मात्र ते मानव, पशू, पक्षी, कीट-पतंग आणि पर्यावरण यांसाठी बाधक नाहीत. गोमयाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचर्‍यापासून ‘कंपोस्ट’ पद्धतीने उत्तम खत बनवले जाऊ शकते.

२ आ. आप : गोमय आणि गोमूत्र भूमीवरील पाणी अन् पावसाचे पाणी यांची शुद्धी करते. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होत असते.

२ इ. तेज : गायीचे तूप हवनाच्या माध्यमातून अग्नीरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेजतत्त्वाची शुद्धी करण्यासह आकाशादी सर्व देवतांची तृप्ती करते.

२ ई. वायू : दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकेल.

२ उ. आकाश : आज प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अतिवृष्टी आणि अनावृष्टी, यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

३. पंचमहाभूतनिर्मित मनुष्याच्या शरीराला होणारे गायीचे लाभ !

३ अ. गोमूत्र : हे पावित्र्य निर्माण करणारे आहे. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करते, तर काही रोगांना शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करते.

३ आ. गायीचे दूध : हे बुद्धीवर्धक, चापल्यवर्धक (स्फूर्तीदायी), रोगप्रतिबंधक आणि शरिराचे पोषण करण्यास संवर्धक आहे.

३ इ. गायीचे तूप, ताक आणि पंचगव्य : हे सर्व पदार्थ गायीच्या माध्यमातून मानवाला मिळालेला ईश्वरनिर्मित उत्तम आहार आहे.

४. गायीचे लाभ ओळखून सर्वांनी तिच्या पालनाची प्रतिज्ञा करणे, ही काळाची आवश्यकता !

रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा ।ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ॥

अर्थ : आम्ही गोमातेचे नेहमी रक्षण करू. आम्ही नेहमी गोपालन करू. तसेच गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन यांविषयी सतत चिंतन करू. हे गोमाते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला जनमानसांत पुन्हा प्रस्थापित करू.’

(‘गीता स्वाध्याय’, जुलै २०११)