WB Temples Vandalised : जलपाईगुडी (बंगाल) येथे हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण – देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

  • संतप्त हिंदूंनी राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे रोखल्या !

  • पोलिसांनाही वाटेत अडवले !

कोलकाता (बंगाल) – राज्यातील जलपाईगुडी जिल्ह्यात असलेल्या खोलाई गावात धुपगुरी येथे एकाच वेळी हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या वेळी मंदिरांत ठेवलेल्या देवतांच्या मूर्तीही फोडण्यात आल्या. ज्या मंदिरांची हानी झाली, त्यांत श्री कालिमातेची दोन मंदिरे, एक शिवमंदिर आणि एक शनि मंदिर यांचा समावेश आहे. एकाच रात्री ही आक्रमणे झाल्यामुळे ती पूर्णपणे नियोजित असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने जलपाईगुडीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (ग्रामीण) समीर अहमद यांना या घटनेविषयी विचारले असता त्यांनी माहिती सांगण्यास टाळाटाळ केली.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

१. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार चौपाठी श्री कालिमाता मंदिर, सातवेंडी श्री शिव मंदिर, जंगलबारी श्री कालि मंदिर आणि गोरेरारी श्री शनि मंदिर या मंदिरांवर आक्रमण करण्यात आले.

२. यावरून संपूर्ण परिसरात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त आंदोलकांनी अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग २७ सह सर्व रस्ते रोखून धरले. यासह शालबारी, पलकाटा यांसह अनेक ठिकाणी रेल्वे रोखल्या. घटनास्थळाकडे जाणार्‍या पोलिसांनाही वाटेत अडवण्यात आले.

तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदु समुदाय धोक्यात ! – भाजप

याप्रकरणी भाजपने बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर टीका केली. बंगालमधील भाजपच्या ‘एक्स’ खात्यावरून सांगण्यात आले आहे की, हे हिंसक कृत्य तृणमूल काँग्रेसच्या सततच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचाच थेट परिणाम आहे. यामुळे हिंदु समुदाय धोक्यात आहे.

दुसरीकडे विश्‍व हिंदु परिषदेचे म्हणणे आहे की, ही आक्रमणे स्थानिक प्रशासनाच्या अपयशामुळे घडली.

३. हिंदूंनी या घटनांचा निषेध करण्यासाठी स्थानिक हिंदूंनी बैठक आयोजित केली होती. यामध्ये स्थानिक संतांनीही सहभाग घेतला.

४. जलपाईगुडीचे पोलीस आयुक्त खंडाबहाळे उमेश गणपत यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. गणपत म्हणाले की, ही घटना अस्वीकारार्ह आहे. आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार असून पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत. सहस्रावधी लोकांच्या उपस्थितीत पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यात विहिंप आणि हिंदु जागरण मंच यांचे अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. तक्रारीत १८ मेच्या पहाटे ५ वाजता एका स्थानिक व्यक्तीने तोडफोड करतांना पाहिल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • बंगालमधील घटना पहाता ‘बंगाल हा आता दुसरा बांगलादेश बनला आहे’, असे वाटण्यासारखी स्थिती आहे ! यास साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस हेच उत्तरदायी आहेत. त्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू केली पाहिजे आणि सर्व बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले पाहिजे !
  • अशा घटना मुसलमानांच्या संदर्भात घडल्या असत्या, तर एव्हाना संपूर्ण देशात जाळपोळीच्या आणि हिंदूंवर आक्रमणांच्या घटना घडल्या असत्या !