इराण आतंकवादाची निर्यात करतो; म्हणून त्याच्याशी संबंध निर्माण करणे धोक्याचे !

अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेटी यांचे चाबहार बंदर करारावरून विधान !

वॉशिंग्टन (अमेरिका) – चाबहार बंदराविषयी भारत आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या करारानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला निर्बंधांची धमकी दिली आहे. यानंतर अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी विधान केले आहे. भारतात एक वर्ष पूर्ण झाल्याविषयी गार्सेटी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, इराण आतंकवादाची निर्यात करतो; म्हणून इराणशी संबंध निर्माण करणे धोक्याचे आहे. व्यावसायिकांना हे कळले पाहिजे.

गार्सेटी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर म्हटले की, आम्ही परराष्ट्र विभागाकडून करण्यात आलेल्या विधानावर अधिक स्पष्टीकरणाची वाट पाहत आहोत. इराण ही आतंकवादाची शक्ती आहे, हे आपण जाणतो. इराण ही अनेक चुकीच्या गोष्टींची निर्यात करणारी शक्ती आहे. हे केवळ मध्य-पूर्वेतच नाही, तर इतर ठिकाणीही आहे. आम्ही सामान्यत: निर्बंध लादतो; परंतु काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये जेथे धोरणात्मक हितसंबंध आहेत, तेथे शिथिलता दिली आहे; परंतु बहुतेक व्यवसायांना हे ठाऊक असले पाहिजे की, इराणशी संवाद साधण्यात धोका आहे; कारण तो आतंकवाद निर्यात करतो. इराण दुसर्‍या सार्वभौम देशावर थेट आक्रमण करतो. अलीकडे त्याने इस्रायलवर केलेले आक्रमण आपण सर्वांनी पाहिले आहे. हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. भारताच्या आजूबाजूला लोकशाही आणि कायद्याचे पालन करणार्‍या देशांत परिस्थिती स्थिर रहावी, अशी आमची इच्छा आहे.

संपादकीय भूमिका

  • आतंकवादाविषयी सोयीची भूमिका घेणारी अमेरिका ! पाकिस्तान जगासाठी आतंकवादाचा कारखाना झाला असतांना अमेरिका अनेक दशके पाकिस्तानला सर्वप्रकारचे साहाय्य करत आहे आणि पाकिस्तान त्या साहाय्याचा वापर भारताविरुद्ध करत आहे, हे अमेरिकेला ठाऊक नाही का ?
  • चाबहार बंदर भारताने आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठीच चालवण्यास घेतले आहे, हे स्पष्ट असतांना अमेरिकेची ही भूमिका ढोंगीपणाची आहे, हे लक्षात घ्या !