संपादकीय : लोकसंख्येचे परिणाम !

‘बहुसंख्यांक असणारे अल्पसंख्यांकांवर अधिकार गाजवतात’, असे म्हटले जाते; मात्र हा नियम किंवा हे धोरण सगळीकडे लागू होत नाही, अशी अनेक उदाहरणे या जगात आहेत. त्यातही ‘अशी उदाहरणे भारतात मोठ्या प्रमाणात मिळू शकतात’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. मूठभर ब्रिटिशांनी जवळपास २०० वर्षे भारतावर राज्य केले. संख्याबळाने ते अल्प असले, तरी बुद्धीबळाने ते पुष्कळच बलवान होते, हे नाकारता येत नाही. ‘जेव्हा ब्रिटीश देश सोडून गेले, तेव्हा त्यांची संख्या ५० सहस्रांहून अधिक नव्हती’, असे सांगितले जाते, म्हणजे त्या वेळी (वर्ष १९४७ मध्ये) पाकिस्तान, बांगलादेशसह असणार्‍या भारताची लोकसंख्या जवळपास ३० कोटी इतकी होती. अशा देशावर ५० सहस्र ब्रिटीश शासन करत होते, हे आश्चर्य आहे. याचा अभ्यास भारतातील हिंदूंनी म्हणजे बहुसंख्य असणार्‍यांनी कधीही केला नाही, हे दुसरे आश्चर्य होय ! त्यातही काही राजकारणी याचा अभ्यास करून ब्रिटिशांची नीती अवलंबत भारतावर राज्य करत आहेत, हे मात्र गेली ७६ वर्षे पहात आहोत. ज्या वेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा विस्टन् चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनी म्हटले होते, ‘भारत एक देश नसून मोठी लोकसंख्या असणारा एक समूह आहे.’ चर्चिल यांना म्हणायचे होते की, मोठी लोकसंख्या असली, तरी राज्य करण्याची बुद्धी भारतियांमध्ये नाही. ‘चर्चिल यांचे विधान खोटे ठरले असले, तरी काही प्रमाणात ते ब्रिटिशांच्या राज्य कारभाराशी तुलना केली, तर सत्यही ठरले आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. यातून सांगायचा उद्देश हाच की, मोठी लोकसंख्या हा प्रकार प्रत्येक वेळेस वरचढ ठरू शकतो, असे म्हणता येत नाही. आजही भारतात हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक आहे. शासनकर्तेही हिंदु आहेत. प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सैनिक आदीही हिंदु आहेत; मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतात हिंदूंना त्यांच्या धर्माच्या आधारे कोणतेही अधिकार नाहीत. याउलट अल्पसंख्यांकांना त्यातही बहुसंख्य असणार्‍या मुसलमानांना सर्वाधिक अधिकार, सुविधा, योजना आहेत आणि बहुसंख्य हिंदु राजकारणी या मुसलमान लोकसंख्येचे लांगूलचालन करण्याचा अहोरात्र आटापिटा करत असतात. त्यामुळे भारतात हिंदूंच्या लोकसंख्येत प्रतिवर्षी घट होत आहे, तर दुसरीकडे मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे, अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय अहवालाद्वारे समोर आली आहे. या अहवालानुसार भारतात हिंदूंची लोकसंख्या ८ टक्क्यांनी घटली, तर मुसलमान ४३.२ टक्क्यांनी वाढले. वर्ष १९५० मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८४.८८ टक्के होती, जी वर्ष २०१५ मध्ये अल्प होऊन ७८.०६ टक्के झाली. दुसरीकडे याच कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या ९.८४ टक्क्यांवरून वाढून १४.०९ टक्के झाली.

पाक आणि बांगलादेश येथील हिंदू !

सध्याच्या स्थितीलाच देशातील ९ राज्यांत हिंदु अल्पसंख्यांक आहेत. मुसलमानांच्या लोकसंख्येत अशाच प्रकारे वाढ होत राहिली, तर येत्या काही वर्षांत देशात हिंदु अल्पसंख्यांक झाल्यास आणि त्यामुळे पुढे त्यांचा वंशसंहार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यातही मुसलमान बहुसंख्यही होण्याची आवश्यकता नाही. सध्या असणारे १४ टक्के मुसलमान म्हणजे अनुमाने २५ कोटी मुसलमान हिंदूंना भारी पडत आहेत. यात आणखी १० ते १५ टक्के जरी वाढ झाली, तरी हिंदूंना ते भारी पडण्यास पुरेसे आहे. यानंतर जे काही होईल, ती केवळ आणि केवळ इतिहासाची पुनरावृत्ती असेल. ब्रिटिशांनी बुद्धीबळाने संख्येत अत्यंत अल्प असतांनाही जगावर राज्य केले, तर मुसलमानांनी संख्याबळाने अल्प असतांना तलवारीच्या बळावर जगातील अनेक देशांवर राज्य केले आणि ते देश मुसलमानबहुल केले. हा या दोघांमधील विशेष भेद आहे. या दोघांनी भारतावर राज्य केले. भारतातील लाखो हिंदूंचे मुसलमानांनी धर्मांतर करून त्यांना मुसलमान केले आणि त्यातून पाकिस्तान अन् बांगलादेश पुढे निर्माण झाले. काश्मीर केवळ भारतीय सैन्यामुळेच भारतात टिकून आहे. त्याचा अर्धा भाग तर पाकने कह्यात घेतलेला आहे. भारताच्या उलट पाकमधील स्थिती आहे. वर्ष १९४७ मध्ये पाकमध्ये हिंदूंची लोकसंख्या १२ टक्के होती, ती आज १.१८ टक्के इतकी राहिली आहे, तर बांगलादेशात वर्ष १९७१ मध्ये २२ टक्के हिंदू होते, आता ते ८ टक्के झाले आहेत. मुसलमान बहुसंख्य असल्यावर काय होते ? हे या दोन उदाहरणांवरून लक्षात येते.

हिंदु शासनकर्त्यांनी कठोर व्हावे !

भारतात समान नागरी कायदा नसल्यामुळे हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी वेगळा कायदा आहे. याचाच परिणाम हिंदु एक पत्नी करू शकतात आणि सरकारी आवाहनाचे अनुकरण करत २ मुले इतकेच कुटुंब ठेवतात. याउलट मुसलमान एकाहून अधिक विवाह करतात आणि अधिकाधिक मुले जन्माला घालतात. त्याच वेळी हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात आणि त्यांच्यापासूनही मुले जन्माला घालतात. यामुळेच मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, तर हिंदूंची घटत आहे. आताची आकडेवारी ही अंतिम नाही. वर्ष २०२१ ची जनगणना अद्याप झालेली नाही. ती झाल्यावर हिंदूंची सध्याची लोकसंख्या अधिक स्पष्ट होईल आणि त्यात हिंदु ७८ टक्क्यांपेक्षा अल्प झाले असणार, यात शंका नाही, तर त्याच वेळी मुसलमान १४ टक्क्यांपेक्षा अधिक झाले असणार, हेही तितकेच खरे असेल. जिहादी आतंकवादी संघटनांचे भारताला इस्लामीस्तान करण्याचे स्वप्न आहे. वर्ष २०४७ पर्यंत त्यांना भारताचे इस्लामीस्तान करायचे आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकसंख्या’ हे एक शस्त्र ते वापरत आहेत. त्याचा परिणाम दिसून येत आहे, हे नाकारता येणार नाही. हे शस्त्र उलथवून टाकण्यासाठी हिंदूंना संघटित आणि जागे होण्याची आवश्यकता आहे. केवळ हिंदूंनाच नाही, तर हिंदु शासनकर्त्यांना विशेष जागे होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंचे लोकसंख्येच्या अभावामुळे होणारे पतन रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. याचा अर्थ हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ करणे नाही, तर मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीवर बंधन घालून त्यांच्यातील कट्टरता संपुष्टात आणली पाहिजे. त्यासाठी धर्मनिरपेक्ष राहून चालणार नाही, हे तितेकच वास्तव आहे. भारताला हिंदु राष्ट्र केल्यावरच ते शक्य होईल. ‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.

हिंदु केवळ बहुसंख्य असून उपयोग नाही, तर ते धर्माभिमानी आणि धर्माचरणी असणे आवश्यक आहे !