पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांची स्वच्छता, त्याचे धोके, तोटे आणि आजार

सध्या उन्हाळा चालू झाला आहे. आपण कुठेही गेलो, तरी पाण्याची बाटली स्वतःसमवेत ठेवतो. लोक पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या बाटलीला सुरक्षित मानतात, त्यामुळे ते त्यातून पाणी पितात आणि त्या प्रतिदिन स्वच्छही करत नाहीत. यामुळे बाटलीच्या आत जीवाणू (बॅक्टेरिया) वाढतात. त्यामुळे आपण आजारी पडतो. अमेरिकेतील ‘वॉटरफिल्टरगुरु डॉट कॉम’च्या संशोधनात असे दिसून आले आहे की, वारंवार वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या बाटलीमध्ये शौचालयाच्या आसनापेक्षा (‘टॉयलेट सीट’पेक्षा) ४० सहस्र पट अधिक जीवाणू असू शकतात. जे लोक पाण्याची बाटली एक-दोनदा स्वच्छ धुऊन भरतात आणि ज्यांना ‘बाटली स्वच्छ आहे’, असे वाटते, त्यांनी या लेखात दिलेली सूत्रे अवश्य वाचावीत.

स्वच्छ पिण्याचे पाणी ( प्रतिकात्मक छायाचित्रं)

१. बाटलीमध्ये भांडी धुण्याच्या सिंकपेक्षा दुप्पट जंतू असणे

अमेरिकेतील ‘वॉटरफिल्टरगुरु डॉट कॉम’च्या संशोधकांच्या पथकाने पुन्हा वापरता येणार्‍या पाण्याच्या बाटल्यांच्या स्वच्छतेची चाचणी केली. त्यांनी बाटलीच्या सर्व भागांची, म्हणजेच तिचा वरचा भाग, झाकण आणि तोंड हे ३ वेळा पडताळले. या संशोधनानुसार बाटलीवर २ प्रकारचे जीवाणू आढळून आले, ज्यात ‘ग्रॅम-नकारात्मक जीवाणू’ (बॅक्टेरिया) आणि ‘बॅसिलस बॅक्टेरिया’ (सूक्ष्म जीवाणू) यांचा समावेश आहे.

ग्रॅम-नकारात्मक जीवाणू विविध प्रकारच्या संसर्गास कारणीभूत असतात, तर ‘बॅसिलस बॅक्टेरिया’मुळे ‘गॅस्ट्रोइंटेस्टाइनल’मुळे (जठर आणि आतडे यांविषयी) समस्या उद्भवू शकतात. संशोधनात बाटलीची तुलना स्वयंपाकघरातील इतर वस्तूंशी केली, ज्यामध्ये असे आढळून आले की, बाटलीमध्ये भांडी धुण्याच्या सिंकपेक्षा दुप्पट जंतू असतात.

२. पाण्याची बाटली प्रतिदिन स्वच्छ करावी का ?

आपण घरात ज्या पद्धतीने इतर भांडी वापरतो, त्याच पद्धतीने बाटलीचा वापर करावा. उन्हाळ्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते; पण याचा अर्थ असा नाही की, फक्त उन्हाळ्यातच वाढतात असे नाही, तर कोणत्याही ऋतूत आपण जेव्हा पाण्याची बाटली वापरतो, तेव्हा ती स्वच्छ करायलाच हवी. शक्य असल्यास काही वेळा उन्हात वाळवायला ठेवा, त्यामुळे त्यातून येणारा वास निघून जातो आणि त्यात असलेले जीवाणू नष्ट होतात. अमेरिकेत करण्यात आलेल्या संशोधनात असेही सुचवण्यात आले आहे की, पाण्याची बाटली दिवसातून किमान एकदा साबण लावून गरम पाण्याने किंवा आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे आवश्यक आहे.

३. पाणी कोणत्या बाटलीत साठवायचे?

पाण्याच्या बाटल्यांविषयी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, काचेच्या बाटल्या अधिक सुरक्षित आहेत; पण त्या स्वतःजवळ ठेवणे तेवढे सोपे नाही. त्यामुळे अशी बाटली घ्या की, ज्यात पिण्याच्या पाण्याचा वेगळा पेला (ग्लास) असेल किंवा ज्याला तोंड नाही.

४. पाण्याच्या बाटलीमध्ये असलेल्या जीवाणूचा प्रभाव धोकादायक

पाण्याच्या बाटलीमध्ये असलेल्या जीवाणूचा प्रभाव धोकादायक आहे.

अ. जे लोक प्रतिजैविक घेत आहेत त्यांच्यावर औषधाचा परिणाम होणार नाही.

आ. पोटदुखी, पित्त (ॲसिडिटी) वाढणे, जुलाब होऊ शकतात.

इ. रक्तदाब वर किंवा खाली होऊ शकतो.

ई. हृदयविकाराचा धोका वाढतो.

उ. उलट्या, मळमळ यांसारख्या समस्या होऊ शकतात.

ऊ. लहान मुलींमध्ये संप्रेरकाचे (‘हॉर्माेन्स’चे) होणारे पालट अकाली असू शकतात.

ए. वारंवार मूत्रमार्गात संक्रमण होण्याचा धोका असतो.

५. शीतकपाटात ठेवलेल्या बाटलीमध्येही जीवाणू असतात का ?

बहुतेक लोक शीतकपाटामध्ये पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात. त्यामध्ये अधिक जीवाणू असतात, जे तुम्हाला आजारी बनवू शकतात. त्यामुळे स्वस्त प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका. प्रत्येक २ ते ३ दिवसांनी उच्च दर्जाची बाटली स्वच्छ केल्याची खात्री करा.

६. बाजारात उपलब्ध असलेल्या बाटलीबंद पाण्यामध्ये जीवाणू नसतात का ?

बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या

जीवाणू असतात; पण ते प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आलेले असतात. ‘लाईव्ह सायन्स’च्या अहवालानुसार पाणी कधीच खराब होत नाही. यावर कुणी म्हणू शकते, ‘बाजारात मिळणार्‍या पाण्याच्या बाटलीवर ‘एक्स्पायरी डेट’ (मुदतबाह्य होण्याचा दिनांक) लिहिली जाते, असे का ?’ वास्तविक ती लिहिलेली दिनांक प्लास्टिकची आहे. ठराविक वेळेनंतर प्लास्टिक पाण्यात विरघळू लागते. त्यामुळे पाण्याची चव पालटून पाणी पिणार्‍याची हानी होईल. बाजारात उपलब्ध असलेल्या बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या एकदाच वापरायच्या प्लास्टिकच्या असतात. आपण त्या बाटल्या पुन्हा पुन्हा वापरण्याची चूक करून आजारी पडतो.


प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे सुरक्षित का नाही ?

पाण्याची प्लास्टिकची बाटली

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेस’ यांच्या मते प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी ‘बीपीए’ (बिस्फेनॉल ए) नावाचे रसायन वापरले जाते. हे रसायन प्रथम वर्ष १८९० मध्ये शोधले गेले; पण १९५० च्या दशकात हे लक्षात आले की, हे रसायन मजबूत आणि लवचिक ‘पॉलीकार्बोनेट प्लास्टिक’ बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याच्या वापरामुळे होणारे परिणाम समोर आल्यानंतर उत्पादकांनी ‘बीपीए’मुक्त उत्पादने बनवण्यास प्रारंभ केला.

प्लास्टिकच्या बाटलीचे तोटे

प्लास्टिकच्या बाटलीमुळे रक्तदाब, ‘टाईप-२ मधुमेह’, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता खराब करते. संप्रेरकांमुळे महिलांमध्ये असंतुलन निर्माण होते. (साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’)


७. कोणती पाण्याची बाटली पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम आहे ?

स्टीलची पाण्याची बाटली

‘बीपीए’ (बिस्फेनॉल ए)मुक्त असलेली किंवा काचेची अथवा स्टीलची बाटली वापरणे चांगले.

८. शाळेत जाणार्‍या मुलांना कोणती पाण्याची बाटली द्यावी ?

मुलांना शाळेत नेण्यासाठी स्टील किंवा चांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या द्याव्यात. त्याही प्रतिदिन स्वच्छ करायला हव्यात; कारण लहान मुले बाटलीला तोंड लावून पाणी पितात. त्या लवकर स्वच्छ न केल्यामुळे तोंडाला लावल्यानंतर बाटलीवरील लाळ हवेच्या संपर्कात येते आणि त्यामुळे अनेक जंतू त्या ठिकाणी येतात.

९. पाण्याच्या बाटल्यांमध्ये जीवाणू कसे वाढतात ?

‘ई-कोलाई’सारखे सर्व जीवाणू वेगवेगळ्या कारणांमुळे पाण्याच्या बाटल्यांमध्ये वाढतात. जसे की,

अ. खाल्ल्यानंतर खरकट्या हातांनी बाटलीला स्पर्श करणे.

आ. बाटली तोंडाला स्पर्श करून पाणी प्यायल्यावर तिला लाळ लागते.

इ. खोकला आणि सर्दी झाल्यास त्याच हातांनी बाटली धरणे.

ई. जेव्हा बाटली बराच काळ पाण्याने भरलेली असते तेव्हा

उ. स्वच्छतेचे काम करतांना घाणेरड्या हातांनी बाटली धरून पाणी पिणे.

यामुळे नवीन ‘टूथब्रश’ किंवा ‘ब्रश’च्या साहाय्याने पाण्याची बाटली पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.

– डॉ. सायमन क्लार्क, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अमेरिका आणि

डॉ. बाळकृष्ण, प्रथमोपचार केंद्र, भोपाळ, मध्यप्रदेश.

(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’)