Chennai Water Crisis : चेन्नईतील सर्वांत मोठे वीरानम सरोवर आटले !

चेन्नईमध्येही पाणीटंचाई

चेन्नईतील वीरानम सरोवर (संग्रहित छायाचित्र)

चेन्नई (तमिळनाडू) – कर्नाटकाची राजधानी बेंगळुरूनंतर आता तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चेन्नईतील ४३ टक्के लोकसंख्येची तहान भागवणारे सर्वांत मोठे वीरानम सरोवर आटले आहे. या तलावाच्या काही भागातच पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अशी स्थिती होती. यंदा ३ महिने आधीच जलसाठे कोरडे होऊ लागले आहेत. २८ फेब्रुवारीपासूनच वीरानममधून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.  इतर जलसाठ्यांची क्षमताही दयनीय आहे. प्रशासनाकडून पुरवठा निम्म्यावर आणला असून काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

१. भूमीवरील साठे आटण्याच्या मार्गावर आहेत. भूजल पातळीही वेगाने घटत आहे. चेन्नईजवळील मेदावक्कम् शहरात एप्रिलमध्येच कूपननिलका (बोअर) आटल्या आहेत. लोकांना प्रतिटँकर १ सहस्र ५०० रुपयांद्वारे पाणी घ्यावे लागत आहे.

२. ‘अण्णा युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च’चे माजी संचालक के. पलानीवेली म्हणाले की, पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन आणि हवामान पालट यांमुळे परिस्थिती आणखी बिघडेल.