धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा ‘भीमशक्ती-शिवशक्ती’च्या बैठकीत निर्धार !

शुभम कुदळे आणि कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात एकत्र बोलावलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना नितीन शिंदे (उजवीकडे), तसेच मान्यवर

सांगली – शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार ‘भीमशक्ती-शिवशक्ती’च्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. सिंधू सांस्कृतिक भवन येथे हिंदुत्वनिष्ठ चळवळीतील नेते आणि आंबेडकर चळवळीतील नेते यांच्या एकत्र झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रारंभी शुभम यांचा भाऊ जगदीश कुदळे यांनी त्यांच्यावर आजपर्यंत झालेले आक्रमण, अन्याय, तसेच धर्मांध कशा प्रकारे परिवारास तेथून धमकावून हुसकावून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत ? याची माहिती उपस्थितांना दिली. या प्रसंगी शैलेश पवार म्हणाले, ‘‘कुदळे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे.’’

सिद्धार्थ कुदळे म्हणाले, ‘‘१०० फुटी रस्त्यावर असणार्‍या एका मशिदीच्या शेजारील आमच्या समाजाची भूमी धमकी देऊन मुसलमान समाजातील लोकांनी कवडीमोल भावाने बळकावली.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक नितीन देशमाने म्हणाले, ‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे या देशात आम्हाला कुठेही रहाण्याचा अधिकार आहे. आमच्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार काही धार्मिक समूह देत नसतील, तर त्यांचा धर्म कोणता ? ते पहाता त्यांच्या विरोधात शेवटपर्यंत लढू.’’

बाळूमामा मंदिराच्या पुजारी सौ. वैशाली रसाळ म्हणाल्या, ‘‘मंदिरात होणारा घंटेचा आवाज आणि संत बाळूमामा यांचा गजर बंद करा, अमावास्येला होणारा बाळूमामांचा महाप्रसाद अन् बाळूमामांचा भंडारा बंद करा, मंदिर बंद करून शामरावनगरमधून तुम्हाला हवी ती रक्कम घेऊन येथून जा’, असा दबाव मुसलमान समाजाकडून टाकला जात आहे.’’

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘या भूमीवर आरक्षण असतांना तेथे धर्मांधांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. आम्ही हे कधीही खपवून घेणार नाही, तसेच हिंदूंच्या घरावर आक्रमण करून त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा धर्मांधांचा डाव उधळून लावू.’’

या प्रसंगी सुरेश दुधगावकर, रोहित जगदाळे, अमर पडळकर, सूरज पवार, बाळासाहेब गोंधळे, किरण कांबळे, नितीन गोंधळे, अभिमन्यू भोसले, धर्माआबा कोळी, संजय जाधव, प्रसाद रिसवडे, अर्जुन कांबळे, दत्तात्रय भोकरे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.