अनधिकृत गोहत्या न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार !

गोरक्षक सेनेचे अध्यक्ष पै. विनायक येडके यांची चेतावणी

सांगली येथे महाशिवरात्रीनिमित्त ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने’ची ह.भ.प. कोटणीस महाराज यांच्या उपस्थितीत स्थापना !

सांगली, ९ मार्च (वार्ता.) – ‘समाजकंटकांच्या हातून होणारी गोहत्या रोखून गोमातेचे संरक्षण होण्यासाठी सांगली येथे ८ मार्च या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने’ची स्थापना ह.भ.प. कोटणीस महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. गोहत्या रोखण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी अनधिकृतपणे होणारी गोमातेची कत्तल थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे संस्थापक अध्यक्ष पै. विनायक येडके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या वेळी पृथ्वीराज पवार, जनसुराज्य प्रदेश अध्यक्ष समित कदम, माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, संस्थापक अध्यक्ष पै. विनायक येडके, गोरक्षक सेनेचे कार्याध्यक्ष अभिमन्यू भोसले, गोरक्षक सेनेचे सचिव धर्मेंद्र कोळी, तसेच गोरक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष पै. कृष्णा खांडेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख उमाकांत कार्वेकर, शहरप्रमुख संदीप ताटे, दिलीप बर्गे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या पत्रकात पै. विनायक येडके यांनी म्हटले आहे की, हिंदु धर्मामध्ये ३३ कोटी देवता मानले जाते. अशा ३३ कोटी देवतांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात येत आहे. यामध्ये निष्पाप मुकी जनावरे बळी पडत आहेत. त्यामुळे या कत्तली थांबवून आणि गोमातेचे रक्षण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात गोहत्याबंदी असतांनाही उद्दाम अधिकारी, तसेच महापालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. या कारणास्तव गोहत्येला आळा घालण्यासाठी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने’ची स्थापना करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्‍या देशात असणे दुर्दैवी !