संपादकीय : धर्मांधांचे पित्त खवळले !

मीरा रोड येथे धर्मांधांनी केलेले आक्रमण

भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेला श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असतांना संपूर्ण भारतात आपोआपच हिंदूसंघटन झाल्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले. २० ते ३० वर्षे पत्रकारितेत असलेले बरेच पत्रकार ‘असे वातावरण आणि हिंदूंमध्ये असा जोश आतापर्यंत कधी पाहिला नाही’, असे सांगत आहेत. श्रीराम आणि श्रीराममंदिर यांनी हिंदूंना परत एकदा एका धाग्यात बांधले अन् हिंदूंना कुठेतरी ‘आपले  साध्य ‘एक’ आहे’, याची आंतरिक जाणीव वाढल्याने अंतर्गत धर्मबंधुत्व वाढीस लागण्यास या निमित्ताने कुठेतरी परत थोडा प्रारंभ झाला. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अलौकिक आणि अद्वितीय झाल्याने संपूर्ण भारतभरातील हिंदू भारावले अन् त्यांच्या श्रद्धेची नाळ परत एका ठिकाणी जोडली गेल्याने त्यांच्यात एक प्रकारचा संघटितभाव निर्माण झाला. ‘या सार्‍या संघटितपणाचा परिणाम कुठेतरी हिंदुत्वाचे वातावरण प्रबळ होण्याकडे अर्थात्च जाणार’, हे वेगळे सांगायला नको. आध्यात्मिक परिभाषेत सांगायचे झाले, तर प्रभूंची प्राणप्रतिष्ठा होऊन श्रीरामतत्त्व कार्यरत होणे आणि देशभर सर्व माध्यमांतून झालेला श्रीरामाचा जयघोष यांमुळे वातावरणातील सात्त्विकता वाढली. सर्वांना ‘दिवाळीपेक्षाही वेगळा सण आहे’, असे वाटले, ते यामुळेच ! रामभक्तीने हिंदूंना एकत्र केले, एकत्र जोडले आणि हीच नेमकी धर्मांधांचे पित्त खवळणारी गोष्ट ठरली नसती, तरच नवल होते. तिकडे पाकच्याही उरात धडकी भरली आणि त्याच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्वेषी फुत्कार सोडले. ‘हे पाकच्या काही भागांवर नियंत्रण मिळवण्यातील पहिले पाऊल आहे’, असे त्याला वाटले आणि नेहमीप्रमाणे ‘भारतात मुसलमान धोक्यात आहेत’, असा कांगावखोरपणा करून जगाला याकडे लक्ष देण्याचे त्याने आवाहन केले. हिंदूंच्या सणांच्या वेळी होणारे हिंदूंचे एकत्रीकरण आणि त्या वेळी वाढलेली सात्त्विकता सहन न होणारे कुठे ना कुठे हिंदूंवर आक्रमण करत असतात. महाराष्ट्रात ६ ठिकाणी अशा घटना घडल्या आणि मुंबईत आणखी २ ठिकाणी दंगलसदृश स्थिती निर्माण करण्याचे धर्मांधांचे नियोजन होते, असे वृत्त आले आहे.

पोलिसांची निष्क्रीयता !

पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेर धर्मांधांनी हिंदूंना भगवे ध्वज लावण्यास विरोध केला

देशभर भगवे ध्वज लावले जात असतांना पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेर धर्मांधांनी दंगलसदृश स्थिती निर्माण करत हिंदूंना भगवे ध्वज लावण्यास विरोध केला. पोलिसांनी धर्मांधांना शिट्या वाजवून हिंदूंच्या अंगावर धावून जाण्यापासून परावृत्त केले; मात्र त्याच वेळी पोलिसांनी धर्मांधांवर कडक कारवाई करून भगवे ध्वज त्या ठिकाणी लावले असते, तर धर्मांधांना थोडा तरी धाक वाटला असता. असे न झाल्यामुळेच लगेचच दुसर्‍या दिवशी हिंदूंवर तलवारीने आक्रमण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ‘संपूर्ण देशात हिंदू एकत्र झाले असतांनाही हिंदूंवर आक्रमण करण्याचे धैर्य धर्मांध दाखवतात’, हे पोलिसांना आक्षेपार्ह वाटत नाही, हे अधिक खेदजनक आहे. काँग्रेसी कुसंस्कार त्यांच्या मनावर इतका खोलवर रुजला आहे की, अजूनही पोलीस स्वतः हिंदु असूनही ‘हिंदूंची ठामपणे बाजू घेऊन, त्यांना साहाय्य करावे; निदान सत्याची बाजू घ्यावी’, असेही त्यांना वाटत नाही. दुसर्‍या दिवशी ‘जे ३ हिंदु युवक पनवेलमध्ये घायाळ झाले, त्याला पहिल्या दिवशी कडक कारवाई न करणारे पोलीसही उत्तरदायी आहेत’, असे हिंदुत्वनिष्ठांना वाटले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंचे नेतेही दुसर्‍या दिवशी घायाळ हिंदूंना पहायला रुग्णालयात गेले आणि त्यांनी कारवाईची मागणी केली. ‘हीच कृती पहिल्या दिवशी केली असती, तर कदाचित् दुसर्‍या दिवशी हिंदूंवर आक्रमण करण्याचे धैर्य धर्मांधांना झाले नसते’, असे हिंदूंना वाटले. शेवटपर्यंत हिंदूंचे भगवे ध्वज पनवेल स्थानकाच्या बाहेर लावले न गेल्याने श्री रामललाच्या उत्सवाची विजयगाथा साजरी करतांना कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात पनवेलकर हिंदुत्वनिष्ठांना मात्र खिन्न वाटले. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि रेल्वेस्थानकाबाहेर भगवे ध्वज लागत नाहीत, तोपर्यंत पनवेलकर हिंदूंच्या मनात ही भावना खदखदत राहील, यात शंका नाही.

हिंदूंची सहनशीलता आणि सहिष्णुता !

मीरा रोड येथे धर्मांधांनी अक्षरशः काठ्या आणि लाथा मारून गाड्या तोडल्या. त्या वेळी अचानक झालेल्या आक्रमणाने हिंदू अक्षरशः घाबरले. मीरा रोड, कल्याण, जळगावमधील रावेर, नागपूर, पनवेल आदी कुठेच आक्रमण झाल्याक्षणी हिंदूंनी तेवढ्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले नाही. हिंदु मूलतःच सहिष्णु प्रवृत्तीचे असल्यामुळे असे होत नाही. ‘हिंदू नेहमी वैध मार्गाने जातात’, हा हिंदूंचा चांगुलपणा आहे. प्रत्येक वेळी पोलीस येतात, हिंदूंनाच अधिक समजावतात; कारण हिंदू ऐकून घेतात. कल्याण येथील घटनेवरूनही हेच लक्षात आले. ‘जेव्हा धर्मांधावर गुन्हे नोंद करण्याची वेळ येते, तेव्हा हिंदूंवरही ते नोंद झालेच पाहिजेत’, असा अलिखित नियमच काँग्रेसच्या काळापासून पोलीस ठाण्यांमध्ये चालू आहे. हिंदू कधीही स्वतःहून धर्मांधांशी भांडण उकरून काढत नाहीत; उलट धर्मांध मात्र भांडण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी निमित्तच शोधत असतात. प्रत्येक वेळी त्यांचे दगड, बाटल्या, काठ्या आणि अगदी तलवारीही सिद्ध असतात. हिंदूंची मात्र कधीही काहीच सिद्धता नसते आणि ते कायम बेसावध असतात. ‘कुणी त्यांच्यावर आक्रमण करील’, असे त्यांना कधी स्वप्नातही वाटत नाही. मीरा रोड येथील दंगलीनंतर एका धर्मांधाने हिंदूंना धमकी देणारा अत्यंत अश्लाघ्य भाषेतील व्हिडिओ प्रसारित केला. धर्मांधांच्या अशा द्वेषपूर्ण बोलण्याविषयी ना माध्यमे वृत्ते देतात, ना पुरोगामी त्याविषयी काही बोलतात.

मुंबईत परळ आणि सांताक्रूझ येथेही धर्मांधांनी खाजवून खरूज काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही ठिकाणी परिस्थिती लगेच नियंत्रणात आणली. सांताक्रूझमध्ये मंदिरात येऊन ‘मी तुला गायब करीन’, अशी धमकी धर्मांधाने हिंदूला दिली, तर रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथेही धर्मांधाने ‘वेळ आल्यावर शिर धडापासून वेगळे करू’, असे लिखाण बाबरी ढाचाच्या छायाचित्रासह पोस्ट केले.

वरील सर्व घटनांवरून असे लक्षात येते की, आग खाली धुमसते आहे आणि ती कधीही उफाळून वर येऊ शकते. ‘श्रीराममंदिरानंतर अन्य मंदिरांची मुक्ती आणि हळूहळू रामराज्याकडे वाटचाल अपरिहार्य आहे’, हे पाकसह येथील धर्मांधांनाही कळून चुकले आहे. ही स्थिती दोघांनाही सहन होत नसल्याने द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि कृती यांना आरंभ झाला आहे. ही स्थिती हिंदूंनी समजून घेऊन आता पुष्कळ सतर्क आणि सावध रहाणे आवश्यक आहे. येत्या काळात रामभक्ती वाढवून स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकणे हा त्यांनी त्यांच्या दिनचर्येतील प्राधान्यक्रम ठेवला पाहिजे; अन्यथा त्यांची हानी अधिक होईल, हे ओघाने आलेच. हे टाळण्यासाठी श्रीरामनामाच्या उद्घोषासमवेत त्याचे अखंड स्मरण करून सर्वच गुण अंगीकारण्याच्या मागे आता हिंदूंनी लागले पाहिजे !

श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर आता धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी रामभक्तीसमवेत स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !