अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

कल्याण जनता सहकारी अधिकोषाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाची सांगता

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

ठाणे, १७ डिसेंबर (वार्ता.) – जगातील दुःख, दारिद्र्य आणि शोषण जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आर्थिक जगतातील कार्यकर्त्यांना कार्य करावे लागणार आहे. ‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले. ते कल्याण जनता सहकारी अधिकोषाच्या (बँक) सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या वेळी बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘अधिष्ठान आणि संस्कार यांची जोपासना केली, तरच कुठलीही संस्था पुढे वाटचाल करून प्रगती साधू शकते. शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या छोट्या छोट्या लोकांना पैशांची आवश्यकता असते. या लहानसहान काम करणार्‍या लोकांच्या आर्थिक दुबळेपणाचे निवारण करणे या मूळ उद्देशानेच महाराष्ट्रात सहकारी अधिकोषांचा प्रारंभ झाला. पैसा ही एक व्यवस्था आहे, ती आवश्यक असली, तरी ती कृत्रिम आहे. पैसा खाऊन पोट भरले जात नाही, त्यासाठी भात-पोळीच खावी लागते. या सर्व व्यवस्थेमध्ये माध्यम म्हणून पैशांचा उपयोग आहे; मात्र हल्लीच्या आधुनिक जगात मुद्रा (पैसा) महत्त्वाची होत आहे आणि वस्तूचे महत्त्व घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी अन्नधान्य पिकवणारा शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे.’’

कार्यक्रमप्रसंगी अधिकोषाच्या ‘सुवर्ण बंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी अधिकोषाचे अध्यक्ष सी.ए. सचिन आंबेकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक आणि व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.