हे जग दुर्योधन आणि दु:शासन यांचे आहे ! – कर्नाटक उच्च न्यायालय

  • बेळगावात एका महिलेला मारहाण करून नग्न धिंड काढल्याच्या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त !

  • घटनास्थळी २ घंट्यानंतर पोचणार्‍या पोलिसांना न्यायालयाने फटकारले !

बेंगळुरू (कर्नाटक) – बेळगावमध्ये एका प्रकरणात एका महिलेला मारहाण करून नंतर तिची नग्न धिंड काढून तिला विजेच्या खांबला बांधून ठेवण्यात आले. कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतः या घटनेची नोंद घेऊन केलेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कर्नाटक सरकार आणि पोलीस यांच्याविषयी संताप व्यक्त केला. न्यायालयाने म्हटले की, अशा घटनांनंतर देशाच्या इतर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असेल. असा प्रकार महाभारतातही घडला नव्हता. द्रौपदीसाठी भगवान श्रीकृष्ण धावून आले होते; पण सध्याच्या आधुनिक युगामध्ये तिच्या साहाय्यासाठी कुणीही धावून आले नाही. दुर्दैवाने हे जग दुर्योधन आणि दु:शासन यांचे आहे. त्या महिलेला त्या दानवांच्या दयेवर सोडून देण्यात आले होते. कल्पना करा त्या महिलेला या सगळ्याचा किती मोठा धक्का बसला असेल. आरोपींना माणूस म्हणायची आम्हाला लाज वाटते. कुणी इतके क्रूर कसे होऊ शकते ? असा प्रश्‍न न्यायालयाने या वेळी विचारला.

न्यायालयाने या वेळी ‘पोलिसांना घटनास्थळी पोचण्यासाठी २ घंटे का लागले ? इतक्या हीन पद्धतीने महिलांना वागणूक मिळत असतांना पोलीस कुठे होते ?’ असे प्रश्‍न विचारत यासंदर्भात थेट पोलीस आयुक्तांना न्यायालयासमोर या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. तसेच ‘हे प्रकरण अत्यंत कठोरपणे हाताळले जाईल’, असेही न्यायालयाने प्रशासन आणि आरोपी यांना सांगितले.

काय आहे प्रकरण ?

बेळगावमध्ये ११ डिसेंबर या दिवशी एक तरुणी तिच्या साखरपुड्याच्या दिवशी त्याच गावात रहाणार्‍या तिच्या प्रियकरासमवेत पळून गेली. याचा राग तरुणीच्या कुटुंबियांना आल्यानंतर त्यांनी थेट त्या तरुणाच्या घरी धाव घेतली. त्याच्या आईला बेदम मारहाण केली, तसेच या महिलेची नग्नावस्थेच धिंड काढून तिला एका विजेच्या खांबाला २ घंटे बांधून ठेवले.

संपादकीय भूमिका 

  • या जगातील दुर्योधन आणि दुःशासन यांना धडा शिकवण्यासाठी जनतेने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणे आवश्यक आहे. द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केल्यावर भगवंताने तिचे रक्षण केले. आजही भगवान भक्ताच्या रक्षणासाठी धावून येऊ शकतो, त्यासाठी तशी भक्ती करणे आणि त्याला आतर्तने आळवणे आवश्यक आहे !
  • इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !