Indian Fishermen Detained: श्रीलंकेच्या नौदलाकडून ६ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

एक आठवड्यातील दुसरी घटना

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने ६ भारतीय मासेमार्‍यांना अटक केली आहे. एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पकडण्यात आलेले सर्व मासेमार आंतराष्ट्रीय जलक्षेत्रात मासेमारी करत होते. तरीही श्रीलंकेच्या नौदलाने त्यांना अटक करून त्यांच्या नौका जप्त केल्या. हे सर्व मासेमार तमिळनाडूतील पुदक्कोट्टई जिल्ह्यातील आहेत.

या वर्षात आतापर्यंत २२० मासेमार्‍यांना झाली आहे अटक !

वर्ष २०२३ मध्ये श्रीलंकेने आतापर्यंत भारताचे २२० मासेमार आणि त्यांच्या ३३ नौका जप्त केल्या आहेत. ऑक्टोबर मासामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना पत्र लिहून श्रीलंकेच्या नौदलाकडून तमिळनाडूतील मासेमार्‍यांना होत असलेल्या अटकेविषयी कळवत निर्णय घेण्याची मागणी केली होती. याच वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे भारताच्या दौर्‍यावर आल्यावर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्या वेळी पंतप्रधानांनी विक्रमसिंघे यांच्यासमोर भारतीय मासेमार्‍यांना श्रीलंकेकडून होणार्‍या अटकेचे सूत्र उपस्थित केले होते. (असे असतांनाही श्रीलंकेकडून भारतीय मासेमार्‍यांना अटक होत असेल, तर भारताने आता कठोर होण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारताच्या उपकारामुळे श्रीलंकेला दिवाळखोरीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्य मिळाले आहे, तरीही श्रीलंकेकडून अशा प्रकारचा कृतघ्नपणा केला जात असेल. त्यामुळे भारताने त्याला साहाय्य करण्यापूर्वी आता विचार करण्याची आवश्यकता आहे !