आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले !

  • उत्तरप्रदेश पोलिसांची बेकायदेशीर भोंग्यांवरील कारवाई !

  • ७ सहस्र २८८ भोंग्यांचा आवाज करण्यात आला न्यून !

  • २२ डिसेंबरपर्यंत चालणार अभियान !

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर कारवाई

  • कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये मशिदींची संख्या सर्वाधिक !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यात आले आहेत, तर ७ सहस्र भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. यासह २ जिल्ह्यांत गुन्हेही नोंदवण्यात आले, तर काही ठिकाणी दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर ही कारवाई करण्यात आली आहे; मात्र यात मशिदींची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अभियान २२ डिसेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. आतापर्यंत ६१ सहस्र ३९९ धार्मिक स्थळांची तपासणी करण्यात आली आहे. पहाटे ५ ते ७ या काळात ही तपासणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर पोलिसांनी हे अभियान चालू केले आहे.

या संदर्भात उत्तरप्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की…

१. प्रतिदिन ध्वनीप्रदूषण अल्प करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची संख्या मागवण्यात येत आहे. आतापर्यंत ३ सहस्र २३८ धार्मिक स्तळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. ७ सहस्र २८८ भोंग्याचा आवाज नियमांपेक्षा अधिक होता, ज्यांना नंतर न्यून करण्यात आला आहे.

२. प्रतापगड आणि आगरा येथे प्रत्येकी १ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गौतमबुद्धनगर जिल्ह्यात २१ लोकांकडून दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक म्हणजे ६९८ भोंगे गोरखपूर येथून हटवण्यात आले, तर बरेली येथे सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ९७५ भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला.

संपादकीय भूमिका 

  • उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?
  • ‘राजा कालस्य कारणम् ।’ ‘राजा काळाला कारणीभूत असतो’, असा याचा अर्थ आहे. म्हणजे जर राजाला वाटले, त्याच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, तर तो कोणतेही गोष्ट करू शकतो, हेच यातून लक्षात येते ! भारताला आता अशाच राज्यकर्त्यांची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटल्यास ते चुकीचे ठरू नये !