Corona Heart Disease : कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये हृदयविकार आणि रक्तदाब यांचा त्रास वाढला ! – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा मोठा दावा !

नवी देहली – कोरोनाकाळात ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता,  त्यांना नंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजेच ‘एम्स’च्या संशोधनामध्ये यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. कोरोनानंतर अनेकांना हृदयाशी संबंधित समस्या, तसेच रक्तदाब नियंत्रणाच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवल्या, असे एम्सने म्हटले आहे. कोरोनानंतर हृदयाच्या वाहिन्यांवर परिणाम झाला, असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. यासह रक्तदाबही नियंत्रणात रहात नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

१. ‘एम्स’च्या डॉक्टरांनी कोरोनाचा मध्यम संसर्ग झालेल्या रुग्णांना सल्ला दिला आहे की, वर्षातून एकदा तरी त्यांनी हृदय, तसेच रक्तदाब नियंत्रणात आहे कि नाही ?, हे जाणून घेण्यासाठी चाचणी करावी.

२. एम्सच्या ‘फिजियोलॉजी’ विभागाचे डॉ. दिनू एस्. चंद्रन यांनी सांगितले की, केवळ गंभीर संक्रमणच नाही, तर सौम्य पातळीच्या कोरोना रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. विशेषतः जेव्हा ते बसल्यानंतर उठतात, तेव्हा थकवा आणि हृदयाची धडधड वाढते. रुग्णालयात न जाता बरे झालेल्या ५६ सौम्य कोरोना रुग्णांवर एक अभ्यास केला गेला. यांपैकी ८ ते १० टक्के रुग्णांमध्ये ही समस्या आढळल्याचे डॉ. चंद्रन् यांनी सांगितले.