पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !

पाण्याच्या टँकरचा काळाबाजार, जलवाहिन्या फुटणे आणि पाणी कपात यांमुळे नागरिक त्रस्त !


पुणे –
शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या सूत्रावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. टँकरचा कथित काळाबाजार, अल्प दाबाने होणारा पुरवठा, पूर्वसूचना न देता पाणी बंद करणे, विनाअनुमती कामांमुळे जलवाहिन्या फुटणे आणि काही भागांत मलनि:सारणाचे पाणी मिसळणे या गंभीर समस्यांमुळे पुणेकरांची फरफट होत असल्याचा संताप लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

या टीकेला उत्तर देतांना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. पुण्याच्या ७६ लाख लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गळती आणि नासाडी रोखण्यात महापालिका अल्प पडली, अशी स्वीकृती त्यांनी सभागृहात दिली. (‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पुणे प्रशासनाला पाण्याची गळती आणि नासाडी का थांबवता आली नाही ? हेही समजले पाहिजे ! – संपादक) परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जूनमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले, तसेच कोंढवा, धायरी यांसारख्या उपनगरांमध्ये टँकरच्या फेर्‍या वाढवणे आणि चंद्रपूर धर्तीवर नियोजनात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

संपादकीय भूमिका

पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची स्वीकृती करण्यासमवेत ज्यांच्यामुळे असे झाले, त्यांना कठोर शिक्षाही होणे आवश्यक !