आषाढी वारीमध्ये वारकर्‍यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे

पुणे – यंदा होणार्‍या आषाढी वारीमध्ये कुणाही वारकर्‍याला असुविधा होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. आषाढी वारीच्या निमित्त विधानभवन येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी गतवर्षीपासून निधीचे प्रावधान ठेवण्यास चालू केले आहे. यंदा पालखीसाठी ७६ कोटी रुपयांची संमती दिली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर, जलरोधक मंडप आदींची व्यवस्था केली असल्याची माहिती गोरे यांनी दिली. ‘यंदा ३० लाख विठ्ठलभक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्याने सर्वांनी समन्वयाने काम करावे’, असे पंचायतराज सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. पालखी सोहळ्यात शौचालय उभारणी, टँकरद्वारे पाणीपुरवठा, कार्यरत मनुष्यबळ, औषध वाटप, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आदींविषयी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी माहिती दिली.