वायूप्रदूषणाच्‍या नियमांचा भंग केल्‍याप्रकरणी ८ सहस्र ४४५ कारवाया !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुंबईतील वाढत्‍या प्रदूषणाच्‍या अंतर्गत वाहतूक पोलिसांनी गेल्‍या ९ दिवसांत वायूप्रदूषणाच्‍या नियमांचा भंग केल्‍याप्रकरणी ८ सहस्र ४४५ कारवाया केल्‍या आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत अनधिकृत सायलेन्‍सरची निर्मिती करणार्‍यांवरही कारवाई करणार असल्‍याची माहिती सहपोलीस आयुक्‍त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी दिली.

  • मुंबई वाहतूक पोलिसांची प्रदूषणविरोधी मोहीम !
  • १३ लाख ७५ सहस्र रुपये दंड वसूल

‘पीयूसी’ (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) नसल्‍याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ५ सहस्र ८६६ कारवाया केल्‍या. वाहनांच्‍या सायलेन्‍सरमध्‍ये अनधिकृत पालट केल्‍याविषयी ८४१ वाहनांवर कारवाई केली. या वेळी ५८४ सायलेन्‍सर वाहतूक पोलिसांनी जप्‍त केले. त्‍यांच्‍यावर बुलडोझर चालवण्‍यात आले. राडारोडा अथवा मालाची धोकादायक वाहतूक केल्‍याप्रकरणी १ सहस्र ७३८ वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. या संपूर्ण मोहिमेअंतर्गत १३ लाख ७५ सहस्र रुपये दंड वसूल करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

प्रदूषण रोखण्‍यासाठी आवाहन करूनही त्‍याचे पालन न करणे म्‍हणजे जनतेच्‍या असंवेदनशीलतेचे लक्षण !