Arunachal Christian Prayer Festival : इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !

  • सरकारने अशी अनुमती देणे घटनाबाह्य आणि निषेधार्ह ! – ‘आपतानी दानी-पिलो मेडेर नेलो परिषद’ आदिवासी संघटना

  • आदिवासींचे धर्मांतर करण्याचा घाट घातल्याचा आरोप !

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – राज्य सरकारने शहरामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यावरून येथील आदिवासी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ निषेधार्हच नसून घटनाबाह्यही असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी वर्ष १९७९ च्या अरुणाचल प्रदेश सरकारच्या परिपत्रकाचा संदर्भ देत सांगितले आहे की, अरुणाचल प्रदेश राज्यातील मूळ जाती-जमाती यांच्या संस्कृतीला मारक ठरणार्‍या ख्रिस्ती अथवा अन्य समुदाय यांचे कार्यक्रम ठेवता कामा नयेत. यासंदर्भात ‘आपतानी दानी-पिलो मेडेर नेलो परिषद’ या स्थानिक आदिवासी संघटनेने प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे. ‘जनजाती सुरक्षा मंच अरुणाचल प्रदेश’ आणि ‘अरुणाचल इन्डिजीनस स्टुडेंट्स युनियन’ यांनीही या प्रसिद्धीपत्रकाला त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. ‘जनजाती सुरक्षा मंच अरुणाचल प्रदेश’ संघटनेने यासंदर्भात मुख्य सचिव आणि इटानगरचे पोलीस उपायुक्त यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही प्रविष्ट केली आहे.

‘आपतानी दानी-पिलो मेडेर नेलो परिषदे’ने प्रसारित केलेले प्रसिद्धीपत्रक

१. या प्रसिद्धीपत्रकानुसार इटानगरमधील ‘आय.जी. पार्क’ भागात ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये मिशनरी पॉल दिनाकरन् येणार आहेत. राज्य सरकारने त्यास अनुमती दिली आहे.

२. यावरून परिषदेने सरकारच्या या निर्णयाचे खंडण केले आहे. परिषदेने म्हटले आहे की, सरकारी नियमानुसार स्थानिक अनुसूचित जमातींच्या संरक्षणार्थ एखाद्या धार्मिक संघटनेच्या लोकांविषयी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

‘आपतानी दानी-पिलो मेडेर नेलो परिषदे’ने प्रसारित केलेले प्रसिद्धीपत्रक

३. राज्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक सौहार्द टिकवून ठेवणे हे सरकारचे धोरण असून स्थानिक साध्या लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्याचा कोणताही प्रयत्न होऊ दिला जाऊ नये. ख्रिस्ती अथवा अख्रिस्ती लोकांना स्थानिक आदीवासींचे धर्मांतर करू दिले जाऊ नये.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांचेच धर्मांतर करू पहाणार्‍यांच्या कार्यक्रमास सरकार अनुमती देते यापेक्षा संतापजनक गोष्ट ती कोणती ? यावर हिंदूंचे हितरक्षण करू शकणार्‍या हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे जाणा !