राज्यात १ आणि २ ऑक्टोबरला परिसर अन् गड-दुर्ग स्वच्छता अभियान ! – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर या दिवशी नजीकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर या दिवशी राज्यातील गड-दुर्गांची स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता अन नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री लोढा म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात १ ऑक्टोबर या दिवशी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा. स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रासाठी राज्यात १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाच्या या स्वच्छता विषयक उपक्रमांसाठी सर्वांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करूया.