राजकीय निर्णय आणि कोण कुठल्‍या पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार

मुंबई – राजकीय निर्णय नेते नाही, तर ‘ईडी’ घेते. कोण कुठल्‍या पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते, असे सोडून गेलेल्‍या सहकार्‍यांनी सांगितले आहे. आपल्‍याला सोडून गेलेल्‍या सहकार्‍यांनी त्‍यांच्‍यामागे ‘ईडी’ची कारवाई हे कारण असल्‍याचे सांगितले होते, असा दावा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी १६ ऑगस्‍ट या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केला. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या फुटीनंतर त्‍या मागे काही नेत्‍यांवर असलेल्‍या ‘ईडी’च्‍या कारवाईची टांगती तलवार असल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या मोठ्या नेत्‍यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्‍याचा निर्णय घेतल्‍याची चर्चा होती. आता ‘ती गोष्‍ट खरी आहे’, असे स्‍वतः शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत मान्‍य केले आहे.

शरद पवार पुढे म्‍हणाले की,…

१. मणीपूरमधील परिस्‍थिती चिंताजनक असून मोदी सरकार यावर फक्‍त बघ्‍याची भूमिका घेत आहे. स्‍वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणीपूर येेथे जाऊन लोकांना धीर देण्‍याची आवश्‍यकता आहे.

२. भाजपची भूमिका समाजात तेढ निर्माण करणारी आहे. मोदी सरकारच्‍या अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. भाजपविरोधात जनमत सिद्ध करणे आवश्‍यक आहे.

३. भाजपने अनेक राज्‍यांतील सरकार पाडले. केंद्रातील सत्तेचा अपवापर करून सरकार पाडण्‍यात येत असून उद्धव ठाकरे यांचे सरकारही असेच पाडण्‍यात आले.

४. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍यासमवेत पुणे येथे भेट झाली आहे; पण या भेटीमध्‍ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा ‘प्‍लॅन बी’ सिद्ध असल्‍याच्‍या या केवळ चर्चा आहेत.

५. आमची भूमिका भाजपशी संबंधित नाही. आम्‍ही कधीही भाजपसमवेत जाणार नाही. देश आणि राज्‍य येथील चित्र पालटले पाहिजे. त्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत केंद्र सरकारच्‍या वतीने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत मी ‘औरंगाबाद’च म्‍हणणार आहे.