पुण्‍यावर आतंकवादाचे सावट !

संपादकीय

पुण्‍यात गाड्यांमध्‍ये स्‍फोट करण्‍याच्‍या हेतूने आलेल्‍या २ आतंकवाद्यांना अटक होणे, हे गंभीर !

सध्‍या मुंबई आणि पुणे येथे बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याच्‍या धमक्‍या मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. पुण्‍यासारख्‍या शांत शहरात वर्ष २०१० मध्‍ये झालेल्‍या जर्मन बेकरी स्‍फोटाने १७ जणांचा बळी घेतला होता आणि ५७ जण घायाळ झाले होते. हा खरे तर एक धक्‍काच होता; त्‍यातील आरोपींनाही आता १३ वर्षांनंतर इतक्‍या विलंबाने शिक्षा होत आहे. या घटनेनंतर बराच काळ लोटल्‍यामुळे असेल कदाचित्; पण आतंकवादविरोधी पथक आणि पुणे पोलीस यांना गुंगारा देऊन २ आतंकवादी कोथरूडसारख्‍या परिसरात पकडले जाणे, हे ‘पुणे वाटते तितके सुरक्षित नाही’, हेच सिद्ध करते. नुकताच, म्‍हणजे ४ मे या दिवशीही सहकारनगर परिसरात ‘इलेक्‍ट्रिक्‍स’च्‍या दुकानात प्रचंड मोठा स्‍फोट झाला आहे. या स्‍फोटामध्‍ये झालेली मोठी हानी पहाता आतंकवादविरोधी पथकाने याचे अन्‍वेषण चालू केले. या पार्श्‍वभूमीवर पुण्‍यात गाड्यांमध्‍ये स्‍फोट करण्‍याच्‍या हेतूने आलेल्‍या २ आतंकवाद्यांना अटक होणे, हे गंभीर आहे. पुण्‍यात यापूर्वी सीमीचे जाळेही आढळले होते आणि तिच्‍या आतंकवाद्यांनाही अटक झाली होती. अर्थात्‌च काही स्‍थानिकांच्‍या (स्‍लिपर सेलच्‍या) साहाय्‍याविना अशा कारवाया शक्‍य नसतात, हे स्‍पष्‍टच आहे. काही वर्षांपूर्वी येथूनच ‘इसिस’मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी जाणार्‍या एका धर्मांध विद्यार्थिनीवर कारवाई न करता तिचे समुपदेशन केले होते; मात्र आतंकवादाचा बीमोड करण्‍यासाठी ठोस काहीही केले नाही. ‘आता असे आतंकवादी सापडणे’, ही याचीच फळे म्‍हणावी लागतील. पुण्‍यात ५ सहस्रांहून अधिक बांगलादेशी असल्‍याचेही पुढे आले आहे.

पुण्‍यासारख्‍या बुद्धीवंतांच्‍या शहरातील नागरिकांनीही सतर्क रहाण्‍याच्‍या दृष्‍टीने आणि आतंकवाद्यांच्‍या विरोधात संघटित होण्‍याच्‍या दृष्‍टीने कृतीशील रहाणे, ही काळाची आवश्‍यकता आहे. ‘आपल्‍या आजूबाजूला काय घडत आहे ?’, ‘धर्मांधांच्‍या वस्‍त्‍यांमध्‍ये काय घडत आहे ?’, यांविषयी सर्वांनीच जागरूकता बाळगायला हवी. पुण्‍यात घरमालक बरेच आहेत. त्‍यांनी ‘आपण कोण भाडेकरू ठेवत आहोत ?’ याविषयी पोलिसांना माहिती देणे अत्‍यावश्‍यक आहे. आतंकवाद्यांनी आता त्‍यांचे रंग-रूपही पालटल्‍याने ते हिंदूच वाटतात. त्‍यादृष्‍टीनेही सर्वांची सतर्कता हवी. पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्‍या साहाय्‍यकांवर. आता पकडलेल्‍या २ साथीदारांचा म्‍होरक्‍या पसार झाला आहे. पोलिसांना हे लज्‍जास्‍पद आहे. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्‍लिपर सेल’ यांच्‍याविषयीची निष्‍क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्‍य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्‍या सावटाखाली येऊ न देण्‍याचे आव्‍हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !