सीमा हैदर हिची भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेची याचिका !

भारताचे नागरिकत्व देण्याची केली विनंती !

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पाकिस्तानी महिला सीमा हैदर

नोएडा (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने आता भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेची याचिका केली आहे. यात तिने ती सचिन याच्या प्रेमापोटी भारतात आल्याचे म्हटले आहे. सीमा हिने हीर-रांझा, लैला-मजनू आणि शिरी-फरहाद यांच्या प्रेमकथांचा उल्लेख केला आहे. चित्रपट अभिनेत्री आलिया भट्ट, अक्षय कुमार यांचीही नावे घेत ‘परदेशी नागरिकत्व असूनही ते भारतात राहू शकतात, मग मी का राहू शकत नाही ?’, असा प्रश्‍न विचारला आहे. सीमाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता ए.पी. सिंह यांनी राष्ट्रपतींकडे ही याचिका पाठवली आहे. ३८ पानी याचिकेत सीमा हिने राष्ट्रपतींना भारतात रहाण्याची अनुमती देण्याची विनंती केली आहे.

सीमा हैदर हिने लिहिलेल्या पत्रातील काही सूत्रे

१. मी हिंदु धर्म स्वीकारला आहे. मी काहीही खोटे बोलत नाही. आतंकवादविरोधी पथक माझी चौकशी करत आहे. सीबीआय, रॉ, एन्.आय.ए. यांनी माझी चौकशी केली, तरी मी त्यासाठी सिद्ध आहे.

२. मला भारताचे नागरिकत्व दिले पाहिजे; कारण मी आता भारताची सून आहे. माझे आणि सचिन याचे लग्न झाले आहे.

३. बांगलादेशी, पाकिस्तानी किंवा इतर देशांतील अनेक लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षांत ५ सहस्र २२० परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. या आधारावर मलाही नागरिकत्व मिळायला हवे.