अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गौरक्षा दल

श्री. सतीश कुमार ,राष्ट्रीय अध्यक्ष  गौरक्षा दल  पंजाब

रामनाथी, २० जून (वार्ता.) – ज्या देशात ८० टक्के जनता सनातन धर्माशी संबंधित आहे, त्याच देशात सनातन धर्माच्या श्रद्धेशी संबंधित गोमातांची हत्या होत आहे. जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही धरतीमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील. त्यामुळे अखंड भारत हवा असेल आणि त्याचे विभाजन थांबवायचे असेल, तर गोहत्या थांबवणे आवश्यक आहे, असे मत पंजाब येथील ‘गौरक्षा दला’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,

१. भारतातील गायी बांगलादेशात पाठवल्या जातात. त्या बदल्यात बनावट नोटा आणि अमली पदार्थ भारतात पाठवले जातात. त्याच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशाने देशात आतंकवाद पसरवला जात आहे. त्यामुळे ही गोतस्करी थांबवणे एक धर्मकार्य आहे.

२. खलिस्तानी आतंकवाद हा हिंदू आणि शीख यांना तोडण्याचा प्रयत्न आहे. कोणालाही खलिस्तानी राज्य नको आहे. विदेशी शक्ती धनाच्या बळावर भारतात निरपराध लोकांची हत्या करून घेत आहेत.

३. युद्धाशिवाय काहीही मिळत नाही. पांडवांना केवळ ५ गावांसाठी युद्ध करावे लागले. आपल्याला तर हिंदु राष्ट्र हवे आहे. हिंदु राष्ट्रासाठी लढा देतांना मृत्यू आला, तर मोक्ष मिळेल आणि जिवंत राहिल्यास हिंदु राष्ट्र मिळेल. हिंदु राष्ट्राच्या आवाज आता मोठा मोठा होत चालला आहे.