कुकी ख्रिस्‍त्‍यांचा आतंकवाद !

मणीपूरमध्‍ये ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांनी हिंदु मैतेई समाजावर आक्रमण करतांना परिसीमा गाठली आहे. मागील २-३ दिवसांमध्‍ये मणीपूरचे राज्‍यमंत्री, भाजपचे पदाधिकारी यांच्‍या घरांवर आक्रमणे करून घरे जाळण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. हिंदु मैतेई समाजाच्‍या गावांवर कुकी बंडखोरांनी आक्रमण केल्‍यामुळे तेथे ८ ते १० जणांचा मृत्‍यू झाला, तर १० ग्रामस्‍थ बेपत्ता आहेत. गत २ मासांपासून हिंदु मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्‍याच्‍या न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर कुकी समाज प्रक्षुब्‍ध झाला आहे. हिंदु मैतेईंना हा दर्जा मिळू नये, मैतेईंच्‍या मागण्‍या अमान्‍य व्‍हाव्‍यात आणि स्‍वत:चे वेगळे राज्‍य असावे, या मागण्‍यांसाठी कुकी हिंसाचार करत आहेत. मुख्‍य म्‍हणजे मणीपूर पोलीस, सैन्‍य आणि मणीपूर रायफल्‍स यांचे सैनिक राज्‍यात तैनात असतांनाही कुकींची हिंसाचार करण्‍याची हिंमत होत आहे, यावरून त्‍यांना हिंदूंविरुद्ध भडकावण्‍यात येत आहे, हे लक्षात येते. सैनिकांचे म्‍हणणे आहे की, कुकी बंडखोरांकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रे आहेत. सैन्‍य आणि बंडखोर यांच्‍यात झालेल्‍या चकमकीमध्‍ये काही कुकी बंडखोर ठार झाले आणि काही पळाले, तेव्‍हा अत्‍याधुनिक स्‍वयंचलित रायफल्‍स सापडल्‍या. सैन्‍याने आतापर्यंत १०० हून अधिक रायफल्‍स जप्‍त केल्‍या असून कुकी बंडखोरांनी त्‍या राज्‍यातूनच पळवल्‍या आहेत. यातून कुकींची आक्रमण करण्‍याची सिद्धता लक्षात येते. मागील काही लिखाणामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे कुकी समाज हा मणीपूरचा डोंगराळ भाग आणि टेकड्या येथे रहातो, तर मैतेई समाज खोर्‍यामध्‍ये रहातो. कुकी समाजही बहुतांश आदिवासी वर्गात मोडतो, ते ख्रिस्‍ती धर्मीय आहेत. ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांना शहरे, गावे येथील लोक बळी पडत नसल्‍याने ते आदिवासी पाड्यांना धर्मांतरासाठी लक्ष्य करतात. आदिवासी पाड्यांमध्‍ये जाऊन साहाय्‍य वाटपाच्‍या नावाखाली त्‍यांचे धर्मांतर करण्‍यात येते. मुख्‍य म्‍हणजे ‘धर्मांतर हे राष्‍ट्रांतर’, असे स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्‍याप्रमाणेे एरव्‍ही वनातील देवतांची उपासना करणारे आदिवासी ख्रिस्‍ती बनल्‍यावर मात्र हिंदूविरोधक होतात. शांततेचे जीवन सोडून आक्रमक होतात. मणीपूर येथे हेच दिसून येत आहे.

कुकींना देशविघातक शक्‍तींचे साहाय्‍य !

‘ख्रिस्‍ती म्‍हणजे मानवता, शांती यांची मूर्ती’, असा एक गैरसमज आहे. कुकींच्‍या हिंसाचारामुळे हा गैरसमज असल्‍याचे लक्षात येते. ख्रिस्‍त्‍यांची क्रूरता गोव्‍यात इन्‍विझिशनच्‍या (हिंदूंच्‍या धर्मच्‍छळाच्‍या) वेळी दिसून आली. ही खुनशी वृत्ती मणीपूरमध्‍ये दिसून येते. मणीपूरमधील संघर्ष हा कुकी आणि मैतैई अशा २ जमातींमधील संघर्ष म्‍हणून न पहाता तो ख्रिस्‍ती आणि हिंदू यांच्‍यामधील संघर्ष म्‍हणून पाहिला, तर तो थांबवण्‍यासाठी नेमकेपणाने उपाययोजना करता येतील.

स्‍वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे की, जेव्‍हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्‍हा केवळ एक जण परधर्मात जातो, असे नसून हिंदूंचा एक शत्रू वाढतो. हे किती सार्थ आहे ? याची मणीपूरमधील संघर्षात प्रचीती आली. कुकी भाजपच्‍या नेत्‍यांच्‍या घरांवर, राज्‍यमंत्र्यांवर आक्रमणे का करतात ? तर भाजप हिंदुत्‍वनिष्‍ठ आहे म्‍हणून ! तसेच यातून कुकी यांना कुणाचीच भीती नाही किंवा त्‍यांना कुणीही अटकाव करू शकत नाही, अशी त्‍यांची धारणा झालेली दिसते. यातून आणखी एक गोष्‍ट लक्षात येते, ती म्‍हणजे राज्‍य सरकार आणि सैन्‍य यांच्‍याविरुद्धचा संघर्ष बराच काळ चालू ठेवला जातो, म्‍हणजे कुकींना बाहेरील देशविघातक शक्‍तींचे निश्‍चितपणे साहाय्‍य मिळत आहे. त्‍याविना कुकी बंडखोरांकडे एवढी शस्‍त्रास्‍त्रे, जाळपोळीची साधने असणे शक्‍यच नाही. मैतेईंची मंदिरेही पाडण्‍यात आल्‍याची माहिती आहे. कुकी समाज डोंगरावर रहात असल्‍याने खोर्‍यात रहाणार्‍या मैतेईंवर आक्रमणे करून पुन्‍हा डोंगररांगांमध्‍ये गायब होणे त्‍यांना शक्‍य आहे. परिणामी त्‍यांना पकडणे पोलीस, सैन्‍य यांना जिकिरीचे बनते. मैतेई यांना म्‍यानमार येथील घुसखोर, अन्‍य घुसखोर यांमुळे आधीच असुरक्षित वाटत असल्‍याने, तसेच घुसखोरांकडून त्‍यांची भूमी, संपत्ती ओरबाडण्‍यात येत असल्‍याने त्‍यांच्‍या अस्‍तित्‍वाचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने त्‍यांनी अनुसूचित जमातीचा दर्जा देण्‍याची मागणी केली आहे. ‘हा दर्जा मिळाल्‍याने तरी स्‍वत:ची संपत्ती, भूमी आणि प्राण यांचे रक्षण होईल’, असे मैतेईंना वाटते. परिणामी त्‍यांची मागणी रास्‍त आहे. न्‍यायालयालाही हे पटले आहे; मग राज्‍य सरकार आणि केंद्र सरकार घाबरते कुणाला ?

कुकींनी मणीपूरच्‍या राज्‍यमंत्र्यांवर आक्रमण केले. जेथे राज्‍यमंत्री सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्‍य मैतेई समाज किती असुरक्षित असतील ? त्‍यांना कोणत्‍या दिव्‍यातून जावे लागत असेल ? याची कल्‍पना येते. मैतेई समाजाकडे शस्‍त्रास्‍त्रे नाहीत, तसेच त्‍यांचा एवढा संघटित प्रतिकार नाही. परिणामी त्‍यांना घाबरून जंगलात पळून जावे लागत आहे किंवा राज्‍याच्‍या सीमेबाहेर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा लागत आहे. असाच प्रसंग काश्‍मीर येथील हिंदूंच्‍या संदर्भात वर्ष १९९० मध्‍ये घडला होता. तेथील धर्मांधांनी हिंदूंविरुद्ध जिहाद चालू करून हिंदूंना ‘एकतर धर्मांतरित व्‍हा किंवा सर्व संपत्ती, बायका-मुलींना येथेच सोडून चालते व्‍हा’, असे धमकावले होते. साडेचार लाख हिंदूंना तेथून पलायन करावे लागले होते. सहस्रो हिंदूंना ठार करण्‍यात आले. त्‍यांची घरे, मंदिरे जाळण्‍यात आली. तेव्‍हा जग शांत राहिले होते. आताही मणीपूर येथे हिंदूंना पलायन करावे लागत आहे, तरी त्‍याकडे २ जमातींमधील संघर्ष म्‍हणून कानाडोळा करण्‍यात येत आहे. अशा वेळी केंद्र सरकारने सैन्‍याला मैतेई हिंदूंचे रक्षण आणि कुकी आतंकवाद्यांचा नायनाट करण्‍याचे आदेश द्यावेत, हीच सर्व हिंदूंची इच्‍छा !

मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?