मंचरच्या घटनेमुळे ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद होत नाही’ हा अपसमज दूर झाला असेल ! – नितेश राणे, आमदार, भाजप

नितेश राणे यांची लव्ह जिहाद प्रकरणावरील भूमिका !

बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे (मध्यभागी)

 पुणे – ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ होत नाही’, असा अपसमज सातत्याने पसरवला जात आहे. महाराष्ट्रातील काही नेते म्हणतात की, ‘लव्ह जिहाद’ होत नाही. मंचर येथे जी घटना घडली त्यामुळे हा अपसमज दूर झाला असेल. ‘आमच्या बहिणींकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहिले, तर डोळे ठेवणार नाही’, हा संदेश देण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत. हिंदु समाज आता जागृत होत चालला आहे. जो कुणी धर्म पालटण्याची बळजोरी करणार असेल, तर तो २ पायांवर जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. पुणे येथील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादविषयी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी भूमिका मांडली.

नितेश राणे पुढे म्हणाले की,

१. असंख्य हिंदू मुलींसमवेत असे प्रकार घडत आहेत. पोलीसदलातील काही अधिकारी बोलत नाहीत; पण काही विशिष्ट अधिकारी समोरच्या लोकांना साहाय्य करत आहेत. त्या संबंधी जिहाद्यांवर केस टाकू नये; म्हणून साहाय्य केले आहे. आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. जिहाद्यांना कळू दे की, गृहमंत्री पालटला आहे. राज्यात आता मविआचे सरकार राहिलेले नाही.

२. मी सातत्याने पोलीस विभागाच्या संपर्कात आहे. समाज म्हणून जोपर्यंत आपण उभे रहात नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायद्याची प्राथमिक मांडणी सभागृहात झाली आहे. या पावसाळी अधिवेशनात कडक कायदा आणला जाईल.

सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष केली टीका !

महाराष्ट्राच्या काही ताई बोलतात की, ‘लव्ह जिहाद’ होत नाही; पण ताई तू मंचरच्या बहिणीला भेटायला गेले पाहिजे. तुला त्या शाहरूखच्या मुलाची चिंता आहे. या बहिणीला भेटायला यायला पाहिजे होते, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.