‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा नोंद !

  • बंगालमध्ये घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना तृणमूल काँग्रेस सरकार करत असलेल्या साहाय्याचे चित्रण !

  • चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी नोटीस !

दिग्दर्शक सनोज मिश्रा

कोलकाता (बंगाल) – ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) प्रदर्शित करण्यात आल्यानंतर बंगाल पोलिसांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या चित्रपटात बंगालमधील धर्मांध रोहिंग्या मुसलमानांविषयी कथा दाखवण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट मासामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाद्वारे बंगालची अपकीर्ती करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे निर्माते आणि उत्तरप्रदेशचे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी म्हणजे आताचे जितेंद्र नारायण सिंह हे आहेत. पोलिसांनी सनोज मिश्रा यांना ३० मे या दिवशी चौकशीसाठी उपस्थित रहाण्याची नोटीस बजावली आहे. मिश्रा यांचे अधिवक्ता नागेश मिश्रा म्हणाले की, आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहेत.

तृणमूल काँग्रेस सरकार विदेशी आतंकवादी संघटनांचा उद्देश पूर्ण करत आहे ! – जितेंद्र नारायण सिंह

जितेंद्र नारायण सिंह

जितेंद्र नारायण सिंह यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाच्या वेळी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून बंगालची स्थिती अत्यंत धोकादायक होत चालली आहे. तेथे मोठ्या प्रमाणात कट्टरतावादी रोहिंग्या मुसलमानांना वसवण्यात येत आहे. बंगालचे तृणमूल काँग्रेस सरकार त्यांना मतपेढी बनवण्यासाठी आधारकार्ड बनवून देत आहे. त्याद्वारे मतदार सूचीमध्ये नावे समाविष्ट करत आहे. यामुळे बांगलादेशच्या सीमेवर रोहिंग्या मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. हे रोहिंग्या बंगालमधून ओळखपत्रे बनवून देशभरात पसरत आहेत.

(सौजन्य : inKhabar) 

विदेशी आतंकवादी संघटनांचा उद्देश बंगालचे तृणमूल काँग्रेस सरकार पूर्ण करत आहे. बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याने त्यांना पलायन करावे लागत आहे. बंगालची हीच स्थिती या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


(सौजन्य : Filmo Ka Bazar) 

संपादकीय भूमिका 

बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही. अशा सरकारला विसर्जित करण्यातच बंगालमधील हिंदूंचे आणि देशाचे भले आहे !