स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या पर्वतप्राय कार्याचे ऋण फिटणे कदापि शक्य नाही ! – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना

‘नुसते ज्ञान लंगडे, तसेच नुसते कर्म आंधळे ! ज्ञानयुक्त कर्म हेच खरे श्रेयस्कर’, असा उपयुक्त संदेश देणार्‍या वीर सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.

साहित्य, इतिहास, राजकारण, अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत सावरकर यांनी करून ठेवलेल्या पर्वतप्राय कार्याचे ऋण फिटणे कदापि शक्य नाही.

सावरकर जन्मशताब्दी वर्षात ‘प्रबोधन’ संस्थेने प्रा. ह.त्र्यं. देसाई यांनी लिहिलेल्या ‘शतपैलू सावरकर’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे ठरवून लोकप्रबोधनाचे बहुमोल काम केले आहे. श्री. देसाई यांनी सावरकर-चरित्राचे सारेच तेजस्वी पैलू यथार्थपणे शब्दात पकडले आहेत. प्रत्येक तरुणाने या ग्रंथात प्रकट झालेल्या सावरकरांच्या विविध पैलूंचे दर्शन घ्यावे. तीच स्वातंत्र्यविरांना खरी आदरांजली ठरेल.’

– बाळ ठाकरे

(साभार : ‘शतपैलू सावरकर’ पुस्तकासाठीचे मनोगत)