साम्यवाद्यांनी माझ्या जीवनातील २० वर्षे नष्ट केली ! – अभिनेते पीयूष मिश्रा  

साम्यवादी सांगायचे आई-वडील घाणेरडे आहेत, पैसा कमावणे पाप आहे ! – मिश्रा यांचा दावा

अभिनेते पीयूष मिश्रा

नवी देहली – चित्रपट अभिनेते पीयूष मिश्रा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मान्य केले की, साम्यवाद्यांमुळे त्यांच्या जीवनातील २० वर्षे नष्ट झाली. ते म्हणाले, ‘‘कॉम्रेड (कम्युनिस्ट कार्यकर्ता) बनून माझ्या जीवनाची वाताहात झाली. मोठ्या प्रयत्नानंतर मी साम्यवाद्यांच्या कह्यातून बाहेर पडलो.’’

अभिनेते पीयूष मिश्रा म्हणाले की,

१. साम्यवादी सांगत होते की, कुटुंब ही घाणेरडी गोष्ट आहे, आई-वडील हे घाणेरडे आहेत. तुम्हाला समाजासाठी काम करायचे आहे. मी विचारायचो, ‘हे सर्व समाजाचे भाग नाहीत का ?’ तर ते म्हणायचे ‘नाही. समाजाचे भाग वेगळे असतात.’

२. साम्यवादी माझ्याकडून २० वर्षे काम करवून घेत होते. ‘पैसे कमावणे पाप आहे. जे पैसे कमावतात ते धनिक आणि भांडवलदार होतात. त्यामुळे पैसे कधीही कमवू नको’, असे ते मला सांगत. त्यावर मी ‘हो’ म्हटले. त्यांच्यामुळे मी सर्व काही सोडले. माझे आई-वडील, पत्नी सर्वांना सोडले.

३. जेव्हा माझ्या लक्षात आले की, मी एक वाईट मुलगा ठरलो आहे, तसेच वाईट पती झालो आहे, तेव्हा मी ठरवले की, मी आता वाईट पिता होणार नाही. मला जाणीव झाली की, मी चुकीचे करत आहे. साम्यवाद्यांनी माझे सर्व काही हिरावून घेतले.

४. साम्यवाद्यांमध्ये एक प्रमुख असतो आणि अन्य कनिष्ठ कार्यकर्ते असतात. हे प्रमुख कनिष्ठ कार्यकर्त्यांकडून अत्यंत वाईट कामे करवून घेत असतात. कनिष्ठ कार्यकर्ते प्रमुखाला विचारून आता काय खायचे, काय प्यायचे, असे करत असतात.

५. साम्यवाद्यांसमवेत काम करून माझी शारीरिक स्थिती अत्यंत वाईट झाली. माझी मानसिक स्थितीही बिघडली. भावनेच्या स्तरावर मी विकलांग झालो होतो. यानंतर मी त्यांना सोडले आणि चांगला पिता होण्यासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

संपादकीय भूमिका

साम्यवादी विचारसरणी जगात येऊन १०० वर्षे झाली आणि जगातून आता तिचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे. ‘असे का झाले ?’, हे मिश्रा यांच्या विधानांवरून लक्षात येते ! देवाला न मानणार्‍यांची हीच गत होते, हे पुन्हा सिद्ध होते !