एरव्‍ही ‘ब्रेकिंग न्‍यूज’चा सपाटा लावणार्‍या प्रसारमाध्‍यमांना केरळमधील हिंदु तरुणींचे वास्‍तव लक्षात कसे आले नाही ?

धाडसी पाऊल ! 

५ मे २०२३ या दिवसाची अनेक हिंदू प्रतीक्षा करत आहेत. ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट त्‍या दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन सुदीप्‍तो सेन यांनी केले असून विपुल शहा हे निर्माते आहेत. केरळमधील हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींना ‘लव्‍ह जिहाद’च्‍या जाळ्‍यात अडकवून मुसलमान बनवण्‍यात आले. या सत्‍यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. ‘एका राज्‍यातून सहस्रो मुली बेपत्ता होणे, हा संबंधित राज्‍याला इस्‍लामी स्‍टेट बनवण्‍याचा ‘ग्‍लोबल अजेंडा’ आहे’, असा उल्लेख ‘ट्रेलर’मध्‍ये (चित्रपट प्रदर्शित होण्‍यापूर्वी त्‍यातील आशय सारांश रूपाने दाखवणार्‍या व्‍हिडिओमध्‍ये) करण्‍यात आला आहे. सर्वांच्‍याच डोळ्‍यांत झणझणीत अंजन घालून हिंदु मुलींचे भयानक वास्‍तव दर्शवणारा हा चित्रपट सिद्ध केल्‍याविषयी दिग्‍दर्शक आणि निर्माते यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे ! हा ‘ट्रेलर’ सामाजिक माध्‍यमांवर पहिल्‍या क्रमांकावर आहे. ‘हिंदु-मुसलमान’ असा विषय आला म्‍हणजे चर्चा तर घडणारच, वादंग माजणारच आणि गदारोळही होणारच ! हा चित्रपट येणार आहे, अशी वृत्ते गेल्‍या काही दिवसांपासून येत होती, अगदी तेव्‍हापासूनच या चित्रपटाला विरोध चालू झाला. आता तर या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित झाल्‍यापासून सर्वत्र विरोधाची ठिणगीच पेटू लागली आहे. इतके दिवस जे सत्‍य दडवून ठेवण्‍यात आले होते, ते या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून सर्वांसमोर येणार असल्‍याने साम्‍यवादी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! त्‍यांनी स्‍वतःचे टीकेचे हत्‍यार उगारण्‍यास प्रारंभ केलेला आहे.

विपुल शहा

अनेकांनी म्‍हटले की, ‘द कश्‍मीर फाइल्‍स’, तसेच ‘द केरल स्‍टोरी’ हे चित्रपट काल्‍पनिक, तर ‘पठाण’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांमध्‍ये पाकिस्‍तानी ‘आय.एस्.आय.’ ही भारतीय संशोधन आणि विश्‍लेषण विभागाला (‘रॉ’ला) साहाय्‍य करत असल्‍याचे दाखवल्‍याने ते वस्‍तूनिष्‍ठ आहेत.’ खरे पहाता आय.एस्.आय. आणि भारतीय संशोधन अन् विश्‍लेषण विभाग या संस्‍था कधीच एकत्र काम करू शकणार नाहीत, हे उघड सत्‍य आहे. असे असतांना हिंदुद्वेषी मानसिकतेतून टीका करणे कितपत योग्‍य ? आपण कुणाचे समर्थन करतो ? याचेही भान या महाभागांना नाही. त्‍यामुळे त्‍यांचे राष्‍ट्र आणि धर्म द्वेषी षड्‍यंत्र वेळीच उघड करायला हवे. असेच षड्‍यंत्र दिग्‍दर्शक विवेक अग्‍निहोत्री यांच्‍या ‘द कश्‍मीर फाइल्‍स’ या चित्रपटाच्‍या काळातही रचण्‍यात आले होते. त्‍या चित्रपटावर बंदीची मागणीही करण्‍यात आली. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांसमोर जाळपोळ करण्‍यात आली. चित्रपटाला असभ्‍य ठरवण्‍यात आले. एरव्‍ही असभ्‍य किंवा अश्‍लील चित्रपटांना डोक्‍यावर घेऊन बक्‍कळ पैसा कमावला जातो, मग विरोधकांची ‘असभ्‍यते’ची व्‍याख्‍या तरी नेमकी काय आहे ? ते त्‍यांनी सांगावे. ‘या चित्रपटामुळे हिंदु-मुसलमान यांच्‍यात म्‍हणे तणाव निर्माण झाला’, अशी टीकेची झोडही उठवण्‍यात आली. ‘हा चित्रपट निर्माण करण्‍यासाठी १७ कोटी रुपये व्‍यय करण्‍यात आले आहेत; मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतर १९० कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले असल्‍याने हा पैसा काश्‍मिरी हिंदूंसाठी दान करावा’, असे निलाजरे विधान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे तत्‍कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले होते; पण त्‍यांचे काश्‍मिरी हिंदूंच्‍या वंशविच्‍छेदाला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्‍याचे धाडस झाले नाही, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे.

 सौंदर्यामागील क्रौर्य !

केरळचा आतंकवादी आणि क्रूर चेहरा

केरळ राज्‍य म्‍हटले की, आपसूकच सर्वांना तेथील निसर्ग भुरळ पाडतो; पण या सौंदर्याला आतंकवादी संघटना प्रतिदिन गालबोट लावत आहे. यामागील केरळचा आतंकवादी आणि क्रूर चेहरा सर्वांनी पहायला हवा. ‘केरळमधील मुली आणि त्‍यांच्‍या आई यांचा संघर्ष ऐकून डोळे पाणावले’, हे विधान या विषयावर ४ वर्षे संशोधन करून चित्रपट सिद्ध करणारे दिग्‍दर्शक सुदीप्‍तो सेन आणि निर्माते विपुल शहा यांचे आहे. संबंधित विषयाचे गांभीर्य या दोघांच्‍या लक्षात आले आणि ते त्‍यांनी सर्वांसमोर उघड केले; पण प्रतिदिन ‘ब्रेकिंग न्‍यूज’चा सपाटा लावणार्‍या प्रसारमाध्‍यमांना हे वास्‍तव कधीच कसे लक्षात आले नाही कि लक्षात येऊनही त्‍यांनी त्‍याकडे कानाडोळा केला ? याचेही उत्तर शोधायला हवे.

हिंदूंचा निश्‍चय हवा !

‘द केरल स्‍टोरी’मधील घटना केरळमध्‍ये कधी घडल्‍याच नाहीत’, असा दावा करणार्‍यांनी पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत. ४ वर्षे संशोधन करून आणि परिश्रम घेऊन सिद्ध केलेला चित्रपट खोटा कसा काय असू शकतो ? ज्‍या मुलींची तेथील आतंकवादामुळे हानी झाली, त्‍यांनी स्‍वतः कथन केलेल्‍या वेदनांना तुम्‍ही खोटे ठरवून त्‍यांचा अवमान करणार का ? जर असे कधी घडले नसेल, तर मग केरळमधील हिंदूंची लोकसंख्‍या दिवसेंदिवस न्‍यून होत असून मुसलमानांची संख्‍या १० ते १२ टक्‍क्‍यांनी कशी काय वाढते ? या प्रश्‍नांची उत्तरे पुराव्‍यांसह द्यावीत. ‘क्रूर अत्‍याचार करणारा योग्‍य आणि ते दाखवणारा मात्र अयोग्‍य’, अशी विद्वेषी मानसिकता बाळगणार्‍या देशविघातकांसह आतंकवादी समर्थकांना देशातून हद्दपार करायला हवे.

‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाची निर्मिती करणे, हे विपुल शहा यांचे धाडसी पाऊलच म्‍हणावे लागेल. चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतरही विरोध झाल्‍यास शहा यांनी न डगमगता त्‍याला खंबीरपणे सामोरे जावे. सर्वत्रच्‍या हिंदूंनीही विपुल शहा यांच्‍या समर्थनासाठी मोठ्या संख्‍येने संघटित होणे, ही काळाची आवश्‍यकता आहे. केरळमध्‍ये आज जे चालू आहे, ते या चित्रपटातून समोर येईलच; पण ‘केवळ चित्रपट पाहिला आणि सोडून दिले’, अशी संकुचित मानसिकता न बाळगता चित्रपट पहाणार्‍या प्रत्‍येक धर्मप्रेमीने केरळमधील हे अराजक थांबवण्‍यासाठी संघटित व्‍हावे. ‘जे आजवर घडले, ते यापुढे घडू द्यायचे नाही’, असा निश्‍चय प्रत्‍येक हिंदूने करावा. अधिकाधिक महिला आणि तरुणी यांनी हा चित्रपट पहावा अन् तेथील पीडितांच्‍या रक्षणासाठी, तसेच आतंकवादाच्‍या विरोधात संघटित व्‍हावे. केरळमधील वाढता आतंकवाद नष्‍ट करण्‍यासाठी पावले उचलणे, हे धर्मकर्तव्‍य हिंदूंनी पार पाडावे !