(म्हणे)  ‘संघ परिवाराच्या राजकीय लाभासाठी बनवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट!’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांचा फुकाचा आरोप

केरळचे मुख्यमंत्री विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाला ‘संघ परिवाराला निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी बनवण्यात आलेला प्रचाराचा चित्रपट’ असे संबोधून टीका केली आहे.

मुख्यमंत्री विजयन् म्हणाले की,

१. धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्देशाने आणि केरळच्या विरोधात द्वेष पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक ‘द केरल स्टोरी’ चित्रपट बनवण्यात आला आहे, हे त्याचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन) पाहून लक्षात येते. हा चित्रपट धर्मनिरपेक्षतेची भूमी असणार्‍या केरळमध्ये संघ परिवाराचा प्रचार करणरा आहे.  या चित्रपटाला भाजप आणि संघ यांचे वैचारिक समर्थन आहे.

२. केरळच्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी संघ परिवाराकडून करण्यात येणार्‍या विविध प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रचारकी चित्रपट आहे. हा ‘लव्ह जिहाद अस्तित्वात आहे’, हा आरोप प्रबळ करण्यासाठी राबवलेल्या नियोजनाचा एक भाग आहे.

३. ‘लव्ह जिहाद’ला यापूर्वी अन्वेषण यंत्रणा, न्यायालय आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांनी फेटाळून लावले आहे. जी. किशन रेड्डी जे तत्कालीन गृह राज्यमंत्री होते आणि जे आज कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी संसदेत लेखी उत्तरात म्हटले होते, ‘लव्ह जिहाद’ नावाची  कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही.’

४. संघ परिवार कोणताही पुरावा नसतांना ‘लव्ह जिहाद’चे मिथक पसरवत आहे. केरळमध्ये ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारले आणि त्या इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाल्या, हा मोठा खोटारडेपणा आम्ही या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहिला आहे. ही खोटी गोष्ट संघ परिसाराच्या असत्यावर आधारित कारखान्याचे उत्पादन आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘द केरल स्टोरी’ चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यातून केरळमधील सत्य स्थिती संपूर्ण जगाला कळणार असल्याने साम्यवादी केरळ सरकार घाबरले आहे आणि त्यातून अशा प्रकारची टीका मुख्यमंत्री करत आहेत, हे लक्षात घ्या !
  • केरळमधील ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु आणि ख्रिस्ती मुली सीरिया सारख्या देशात पोचल्या, हे सत्य असतांना त्याला खोटे ठरवणारे एका राज्याचे मुख्यमंत्री, हे लोकशाहीला अपकीर्त करतात !