रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रिफायनरी प्रकल्पाविषयी पसरवले जात आहेत गैरसमज

रिफायनरी प्रकल्प (प्रतिकात्मक चित्र)

रत्नागिरी – राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण ‘एम्.आय.डी.सी.’कडून केले जाणार आहे. त्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यांसारखी कृत्ये करणार्‍या ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी, गावबंदी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सामाजिक माध्यमांचा आधार घेत लोकांच्या भावना भडकावणार्‍या लोकांवरही लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘राजापूर तालुक्यात बारसू भागात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एम्.आय.डी.सी.कडून होणार आहे. हे सर्वेक्षण कधी चालू होईल आणि कधीपर्यंत चालेल, याविषयी आपल्याकडे माहिती नाही; मात्र या सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही. ’’